मुंबई । शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आज राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर आणि प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित केले. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना कुणाचा आश्रय आहे, असा थेट सवाल करत अबू आझमींवर तातडीने कारवाई केली जाते, पण संघाशी संबंधित व्यक्तींना वाचवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
प्रशांत कोरटकर ( Prashant Kortkar ) छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करूनही मोकळा फिरतो, हे कसे शक्य आहे, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. कोरटकरचा वरपासून खालपर्यंतचा संपर्क असल्याने त्याच्यावर कारवाई होत नाही का, असा आरोप त्यांनी केला.
Sanjay Raut Attack on Prashant Kortkar, Rahul Solapurkar
राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) याने छत्रपती शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार करून आग्र्यातून सुटका करून घेतल्याचा खोटा प्रचार केला. छत्रपतींनी अत्यंत शिताफीने सुटका करून घेतली, हे इतिहासाने सिद्ध केले आहे. पण सोलापूरकर चुकीचा इतिहास सांगतो, तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही. मात्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावर तातडीने कारवाई झाली, कारण ते मुस्लिम होते, असा घणाघात राऊतांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी “मराठी ही मुंबईची भाषा नाही” असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोशींच्या वक्तव्याचा निषेध केला नसल्याचे सांगितले.
भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य साधे नाही, तर ही भाजपची योजनाबद्ध चाल असल्याचा आरोप राऊतांनी केला. भाजपकडून जाणूनबुजून असे वक्तव्य करून समाजात संभ्रम पसरवला जात आहे. संघाचे नेते सहजपणे असे काहीही बोलत नाहीत, यामागे मोठा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले. राऊतांनी यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करत हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणारे खरे शिवभक्त आहेत का, असा सवाल उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या