🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर- गुवाहाटीला जाऊन केलेला बंड खरोखरच वाया गेला का, असा प्रश्न आता शिंदे गटाच्या नेत्यांनाच पडू लागला आहे का? विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील धुसफूस आता समोर आली असून यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपने स्वतःचा उमेदवार दिल्याने आमदार अब्दुल सत्तार प्रचंड दुखावले गेले आहेत. त्यांचा मुलगा समीर सत्तार याने अपक्ष अर्ज भरत थेट बंडखोरी केली असून सत्तार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, अशी साद त्यांनी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मित्रपक्षच आमचं मुंडकं उडवण्याचं काम करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आमचा गुवाहाटीतील कामाख्या देवीचा त्याग भाजप पूर्णपणे विसरली असून आमच्या पक्षातच गटतट पाडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अनेक छोट्या जागांवर भाजपचे नेते मोठे होत असून शिवसेनेला संपवले जात असल्याचे सत्तार यांनी उघडपणे बोलून दाखवली.
या राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करत सत्तारांचा समाचार घेतला. तुम्ही आणि तुमचे नेते भाजपसोबत घरगडी म्हणून का गेलात, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. भाजपसोबत जाणं ही महाराष्ट्राशी बेईमानी असून आधी यावर जाहीर भूमिका स्पष्ट करा, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेना एकच आहे आणि ती उद्धव ठाकरे यांचीच आहे, असे राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाला हाताशी धरून अमित शाह यांनी ही तात्पुरती कंपनी उभी केली आहे. त्यामुळेच, जर खरंच कृत्याचा पश्चात्ताप झाला असेल तर थेट उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वक्तव्यांमुळे महायुतीत मोठी अस्वस्थता पसरली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यात फोनवरच राडा, …अन् सावे यांनी रागात फोन कट केला
- पार्थ पवार खूप जोरात पळतायत का? प्रश्नांवर सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट
- सुनील तटकरेंचा थेट कबुलीजबाब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या पण ‘त्या’ एका घटनेनं सगळंच बदललं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












