पुणे – दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा एकत्र येणार होत्या आणि त्याची बोलणीही अंतिम टप्प्यात आली होती यावर तुमचा विश्वास बसेल का? महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, म्हणूनच सध्या राजकारण तापलंय. खासदार सुनील तटकरे यांनी स्वतः या पडद्यामागच्या गुप्त हालचालींची जाहीर कबुली दिल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यावर बोलताना तटकरे यांनी थेट सांगितलं की, दादांच्या निधनापूर्वी दोन्ही बाजू एकत्र येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू होत्या. प्राजक्त तनपुरे यांनी जो दावा केला होता, तो पूर्णपणे खोटा नाही हेच तटकरेंनी मान्य केलंय.
माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की, या संदर्भात झालेल्या कोणत्याही प्रत्यक्ष बैठकीला मी स्वतः हजर नव्हतो. परंतु, त्या प्रत्येक बैठकीचा सविस्तर तपशील स्वतः दादा मला वेळोवेळी सांगत असायचे. आम्ही सर्वजण या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत अत्यंत जवळून सहभागी होतो. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी काही फार मोठा गौप्यस्फोट केलाय अशातला भाग मुळीच नाही. दादा स्वतः नेते असल्याने ते पवारांसोबतच्या आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करत होते.
पण मग हे दोन्ही गट एकत्र येण्याची प्रक्रिया नेमकी कुठे आणि का अडकली? यावर तटकरेंनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली. दादांच्या अचानक जाण्याने राज्यातील संपूर्ण राजकीय समीकरणं आणि परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. दादा हयात असताना होणारं विलीनीकरण आणि ते गेल्यावर होणारे विलीनीकरण यात खूप मोठा फरक आहे. परिस्थितीतील याच नाट्यमय बदलामुळे विलीनीकरणाचा निर्णय पुढे जाऊ शकला नाही.
दुसरीकडे, अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार यांनी राजकारणात आणि पक्ष संघटनेत सक्रिय होणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते जबाबदारीने सक्रिय झाले. संघटन चालवताना कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये काही बाबींवर वेगवेगळे विचार किंवा वेगळी मते असू शकतात. पण पक्षाची मूळ विचारसरणी आणि पद्धत कायम राहते, असे तटकरे यांनी नमूद केले.
सन १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा शरद पवारांसारखं अत्यंत प्रभावी नेतृत्व पक्षाला लाभलं होतं. पक्षात कोणताही निर्णय घेताना नेहमी लोकशाही मार्गाने सर्वानुमते घेतला जायचा. विधान परिषदेचे उमेदवार निवडायचे असोत, राज्यसभेचे असोत किंवा संघटनात्मक पातळीवर पदाधिकाऱ्यांची निवड असो, तीच पद्धत दादांनी नेहमी अवलंबली. २०२३ नंतर आम्ही जेव्हा महायुतीसोबत एनडीएत सहभागी झालो, तरीही तीच जुनी आणि पारदर्शक पद्धत आम्ही पक्षात आजही सुरू ठेवली आहे, असा हल्लाबोल तटकरेंनी विरोधकांवर केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- विक्रम काकडेंनी भरला फॉर्म, पुण्यात भाजपच्या बंडखोरीने वाढला सस्पेन्स
- प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ची आयपीएल फायनललाही हवा, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क!
- अमोल कोल्हे स्टार प्रवाहवर भडकले, ”मी सावित्रीबाई…” मालिका बंद होण्यामागे उघड केलं दुसरंच कारण…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












