🕒 1 min read
अवघ्या पाच महिन्यांतच एखादी ऐतिहासिक मालिका गुंडाळण्याची वेळ एखाद्या मोठ्या चॅनेलवर का यावी? ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ (Mi Savitribai Jyotirao Phule) ही स्टार प्रवाहवरील मालिका अचानक बंद होणार असल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण टेलिव्हिजन विश्वात एकच खळबळ उडाली.
स्टार प्रवाह (Star Pravah) टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी तब्बल ८ नव्या मालिका घेऊन येत आहे. याच नव्या मालिकांच्या सपाट्यात आता डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि मधुराणी प्रभुलकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या ऐतिहासिक मालिकेचा बळी गेला आहे.
Mi Savitribai Jyotirao Phule
१४ जूनला ही मालिका अवघ्या १५२ भागांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेईल. पण या निर्णयावर डॉ. अमोल कोल्हेंनी थेट चॅनेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच हल्लाबोल केला आहे.
‘मुंबई टाइम्स’शी विशेष संवाद साधताना डॉ. अमोल कोल्हे यांनी चॅनेलच्या निर्णयावर सडकून टीका केली. “एकीकडे आपण महात्मा फुलेंचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत आहोत, आणि दुसरीकडे त्यांचीच मालिका अवघ्या १५२ भागांत संपवली जातेय, हे अतिशय दुर्दैवी आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिक्षण हेच खरं सामर्थ्य, हा विचार रुजवण्यासाठी फुले दांपत्याने केलेला संघर्ष आता मालिकेत खऱ्या अर्थाने सुरू होणार होता. पण नेमक्या त्याच टप्प्यावर मालिका थांबवली जात आहे.
सतीश राजवाडे किंवा अभिजीत खाडे यांनी खूप सहकार्य केलं, पण त्यांच्याही वर बसलेल्या वरिष्ठांची विचारप्रणाली नेमकी काय आहे, हेच समजत नाही, असा मोठा गौप्यस्फोट कोल्हेंनी केला. टीआरपी नसल्याचं कारण चॅनेलने दिलं असलं तरी, कोल्हेंच्या मते हे केवळ ‘अर्धसत्य’ आहे.
आजकाल अनेक प्रेक्षक संध्याकाळच्या प्रसारणाऐवजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मालिका पाहतात, पण त्याचा विचार टीआरपी मोजताना होत नाही. ‘राजा शिवछत्रपती’ सारख्या मालिका आजही पाहिल्या जातात, त्यामुळे ऐतिहासिक मालिकांची ‘आर्काईव्ह व्हॅल्यू’ चॅनेल्स विसरले आहेत का? असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मी सावित्रीबाई…’ मालिकेच्या जागी आता चॅनेलवर ‘सुना येती घरा’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. पण सावित्रीबाईंची ही ऐतिहासिक गोष्ट इथेच संपणार नसून, ती लवकरच एका वेगळ्या मंचावर नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी धक्कादायक माहितीही अमोल कोल्हेंनी दिली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या नव्या मंचाची उत्सुकता लागली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- वैभव सूर्यवंशीला थेट बॉलिवूडची लॉटरी? दिग्दर्शक शेखर कपूरने केली पोस्ट, म्हणाले……
- मविआची यादी आली, पण एकाच जागेवर शरद पवार गटाचे दोन अर्ज आल्याने सस्पेन्स वाढला!
- अरुण लखानी यांना भाजपची उमेदवारी, सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांच्या एन्ट्रीने राजकारण तापलं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











