🕒 1 min read
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काहीही घडू शकतं, पण दोन तुकडे झालेली शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येऊ शकते का? हा विचारच सध्या राजकीय वर्तुळात नव्याने खळबळ उडवून देत आहे.
शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे या दोन्ही नेत्यांनी ‘शिवसेना एकत्र आली पाहिजे’ अशी जाहीर इच्छा व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आलंय. यावर आता खासदार संजय राऊत यांनी थेट ‘मातोश्री’चा रस्ता दाखवत कडक शब्दांत सुनावलं आहे.
Sanjay Raut On Shivsena Merger
सध्या मित्रपक्षच शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. भाजपला आमच्या त्यागाचा विसर पडला असून, आपले दोन तुकडे झालेत, त्यामुळे आता दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी खदखद सत्तारांनी बोलून दाखवली.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनीही दोन्ही गट एकत्र यावेत असं आपल्यालाही वारंवार वाटत असल्याचं स्पष्ट केलं. पण माझ्या एकट्याला वाटून काय उपयोग? अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
यावर संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत हल्लाबोल केला. “शिवसेना एकच आहे आणि जिथे ठाकरे आहेत, तीच खरी शिवसेना. बाकी ज्याला हे लोक शिवसेना म्हणतायत, ती तर अमित शहांची शिवसेना आहे,” असा घणाघात राऊतांनी केला.
ज्या नेत्यांचा स्वाभिमान जागा झालाय आणि ज्यांना भाजपच्या खऱ्या रूपाची जाणीव झालीय, त्यांनी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, असा प्रस्तावच राऊतांनी दिला आहे.
तुम्ही आणि तुमचे नेते भाजपसोबत घरगडी म्हणून का गेलात? असा थेट सवाल राऊतांनी विचारलाय. भाजपसोबत जाणं म्हणजे महाराष्ट्राला खड्ड्यात घालणं आहे, हे सत्तारांनी आपल्या नेतृत्वाला सांगावं, असं खुलं आव्हान राऊतांनी दिल्याने आता राजकारण चांगलंच तापलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- १५ वर्षांच्या वैभवला थेट रोहित-विराटसोबत खेळण्याची संधी? बीसीसीआयच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
- लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र; विरोधकांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!
- महायुतीला रामदास आठवलेंचा थेट इशारा! ‘ते’ एक ट्विट आणि राजकारणात उडाली मोठी खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












