Sanjay Raut | “विरोधकांचं ऐक्य वगैरे अशा शब्दांना महत्व देऊन आतापर्यंत त्याग करत आलो, पण आता…”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई :  नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ उडाल्याने महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद नसल्याचे चित्र पुन्हा एकदा पहायला मिळाले आहे. अगोदर सविस्तर चर्चा होऊनही शेवटी काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ उडालाच. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अन्य प्रमुख पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे (Sudhir Tambe) आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर शिवसेनेने पाठिंबा दर्शवलेल्या शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आले. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मित्र पक्षांना सूचक इशारा दिला आहे.

“या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकासआघाडीच्या उमेदवाराबाबत काही निर्णयाबाबत एक विस्कळीतपणा स्पष्टपणे दिसला. काही निर्णयांबाबत या पुढील निवडणुकीत आपण अधिक काळजीपूर्वक पावलं टाकली पाहिजे. अशाप्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामानये हा धडा या निवडणुकीतून महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने घेतला पाहिजे.” असे सांगत संजय राऊतांनी महाविकास आघाडीतील विसंवाद सांगितला आहे.

दरम्यान, “एकत्र बसून नक्कीच सुरुवातीला चर्चा झाली होती. त्यानुसार नागपूर शिवसेनेसाठी सोडलं होतं. पण शेवटी प्रत्येकवेळी त्याग करण्याची जबाबदारी ही शिवसेनेवरच असते आणि विरोधकांचे ऐक्य वैगेरे या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही हा त्याग करत आलो. पण यापुढे असे होणार नाही. यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू”, असे सांगत संजय राऊतांनी यावेळी मित्रपक्षांना उद्देशून सूचक वक्तव्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Back to top button