Devendra Fadnavis | “त्या शपथविधीला शरद पवारांची संमती”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis | मुंबई : राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. त्यानंतर राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं फक्त 72 तासांचं सरकार चाललं. त्यावरुन भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद झाला. शपथविधीवरुन अनेक राजकीय नेत्यांनी यावर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पहाटेच्या शपथविधी’वर सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

विशेष म्हणजे भल्या पहाटे या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला होता. या पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. ‘पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झालं होतं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती’, असं स्पष्ट विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधी विषयी मोठा खुलासा केला आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा सुरु होती. ती चर्चा पुढे जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. याचदरम्यान आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात”

“माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला”, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.

“आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली”

“दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया”, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

“शरद पवारांशी चर्चा झाली होती”

“राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता. तर दुसरा छोटा होता”, असे म्हणत फडणवीसांनी विश्वासघात झाल्याचे दाेन किस्से सांगितले आहेत.

“तुम्ही पहाटेच्या शपथविधीवर सकाळ, पहाटे किंवा अर्ध्या रात्रीचं म्हणा. काय फरक पडतो? भूतकाळ हा भूतकाळ आहे. पण त्यानंतर या दोघांनी आमच्यासोबत जी वागणूक केली होती, त्यामुळे आम्हाला संधी मिळाली, त्यांच्या पक्षात कुरबुरी झाल्या. त्यांचे लोकं बाहेर पडले. त्यांना माहिती हे मान्य नव्हतं की कशाप्रकारे हे सरकार चालतंय”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-