🕒 1 min read
“शेती परवडत नाही,” असं म्हणणाऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी आज संसदेतून एक नवी आशा जागवली आहे. आता शेतात फक्त धान्य नाही, तर अक्षरशः ‘पैसे’ पिकणार आहेत! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ (Union Budget 2026) सादर करताना पारंपरिक पिकांच्या पलीकडे जात शेतकऱ्यांसाठी ‘हाय व्हॅल्यू’ पिकांचे दरवाजे उघडले आहेत.
सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी, विशेषतः दक्षिण भारत आणि कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये चंदन, काजू, कोको आणि नारळाच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे.
Union Budget 2026
भारत हा जगातील नारळाचा ‘किंग’ आहे, पण जुन्या झाडांमुळे उत्पादन घटत असल्याची खंत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. यावर तोडगा म्हणून सरकारने नारळाच्या जुन्या आणि निष्प्रभ बागा काढून तिथे नवीन, जास्त उत्पादन देणारी रोपे लावण्यासाठी विशेष योजना जाहीर केली आहे. देशातील तब्बल ३ कोटी लोकांचे पोट या व्यवसायावर अवलंबून असल्याने हा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो. तसेच, कच्चा काजू आणि कोकोच्या उत्पादनात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी सरकार खास मिशन राबवणार आहे.
‘पुष्पा’ सिनेमामुळे रक्तचंदनाची चर्चा झाली, पण आता वास्तवातही चंदन शेतकऱ्यांचे नशीब पालटणार आहे. चंदनाचे सांस्कृतिक महत्त्व ओळखून, सरकारने चंदन लागवड आणि त्याच्या ‘व्हॅल्यू चेन’ (Value Chain) विकासासाठी राज्य सरकारांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चंदनाच्या शेतीला कायदेशीर आणि व्यावसायिक प्रतिष्ठा मिळणार आहे.
याव्यतिरिक्त, ईशान्य भारत आणि डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी अक्रोड (Walnut), बदाम आणि पाइननट्स यांसारख्या महागड्या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. थोडक्यात, आता शेतकऱ्यांनी केवळ पोटभरणीची पिके न घेता, जास्त नफा देणाऱ्या पिकांकडे वळावे, असाच सरकारचा स्पष्ट संदेश आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Budget 2026 : मोबाईल, टीव्ही, AC खरेदी करताय? मग थांबा! आता ‘इतक्या’ हजारांची होणार बचत
- बजेटच्या एक दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; चांदी तब्बल 72 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किमतीही कोसळल्या
- रोहित शेट्टीच्या घरावर मध्यरात्री ‘फायरिंग’; ५ राउंड झाडले, मुंबई पोलिसांची १२ पथकं मागावर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











