🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी बाकांवरूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी विधानसभेत बोलताना, महत्त्वाच्या चर्चेवेळी संबंधित विभागाचे सचिव सभागृहात अनुपस्थित राहत असल्याबद्दल तालिका अध्यक्षांकडे तक्रार केली. प्रसंगी ब्रिटनच्या संसदेचे उदाहरण देत, ‘सचिवांना बांधून सभागृहात आणावे लागेल’ असे विधान त्यांनी केले.
मंगळवारी दुपारी २ वाजता विधानसभेत महाराष्ट्र विधिमंडळ नियम २९३ नुसार सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू होणार होती. जवळपास ५० आमदारांनी हा प्रस्ताव मांडला होता. या चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच मुनगंटीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला.
“नियम २९३ अंतर्गत होणारी चर्चा राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते. आपण एकीकडे सुखी, समृद्ध, प्रगत महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न पाहतोय, पण या महत्त्वाच्या चर्चेवेळी संबंधित विभागाचे सचिव सभागृहात का उपस्थित नसतात?” असा सवाल मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी केला. पुढे ते म्हणाले, “मी १९९५ पासून आमदार आहे, तेव्हा विभागाचे सचिव अशा महत्त्वाच्या चर्चांना सभागृहात उपस्थित असायचे. तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांना उद्देशून ते म्हणाले, “तुम्हाला ही एक संधी मिळाली आहे. राज्याच्या शताब्दी सोहळ्यात तुमचे नाव आदराने घेतले जावे यासाठी, २९३ च्या चर्चेला सचिवांनी उपस्थित राहावे असे आदेश तुम्ही द्या. जर त्यानंतरही ते उपस्थित राहिले नाहीत, तर ब्रिटनच्या संसदेत जसे अधिकाऱ्यांना बांधून आणायचे, तशी काही परवानगी आपल्याला देता येईल का? असे करून तुम्ही आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहून घ्या. पुन्हा अशी संधी येणार नाही.”
यावेळी शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनीही मुनगंटीवारांच्या ( Sudhir Mungantiwar ) भूमिकेला पाठिंबा दिला. “सध्या काळ सोकावला आहे. ५० ते ६० आमदारांनी नियम २९३ अंतर्गत प्रस्ताव दिला आहे. यात मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विकासाचे व्हिजन आहे,” असे खोतकर म्हणाले. “मी गेली ४० वर्षे आमदार आहे. १९९० मध्ये सभागृहात बसायलाही जागा अपुरी पडायची कारण सर्व अधिकारी उपस्थित असायचे. पण आज अशी उदासीनता असेल, तर राज्याचे प्रश्न कसे सुटणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तालिका अध्यक्षांनी दिले आदेश
सुधीर मुनगंटीवार आणि अर्जुन खोतकर यांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी तात्काळ यासंदर्भात आदेश दिले. “सभागृहात जरी ही गॅलरी अदृश्य असली, तरी विषय आणि सदस्यांच्या भावना गांभीर्याने घेऊन शासनाने यावर कारवाई करावी. अनेकदा अधिकारी टीव्हीवर कामकाज पाहतात. गरज पडल्यास त्यांचे टीव्ही बंद करा, जेणेकरून त्यांना सभागृहात येण्याची सवय लागेल,” असे निर्देश देत त्यांनी शासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले.
काय आहे नियम २९३?
महाराष्ट्र विधिमंडळ कामकाजाच्या नियमावलीतील नियम २९३ नुसार, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सभागृहात प्रस्ताव सादर केला जातो. या नियमांमुळे सदस्यांना बोलण्याची, सरकारला प्रश्न विचारण्याची आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्याची संधी मिळते.
📌 महत्वाच्या बातम्या
- संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर पलटवार; म्हणाले, “मी १५० दिवस पळून गेलो नाही!”
- गृहराज्यमंत्र्यांवर वाळू चोरीचा गंभीर आरोप; अनिल परब म्हणाले, “पुरावे देतो, हिंमत असेल तर कारवाई करा!
- महाराष्ट्राचं दुर्दैव! शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्याविरोधात बोलल्याने आमदार निलंबित – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








