🕒 1 min read
क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंपेक्षा सध्या बोर्डांचे अधिकारीच जास्त गाजतायत की काय, असा प्रश्न पडलाय. बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिला आणि आयसीसीने त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. पण आता या वादात पाकिस्तानने उडी घेतल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत चक्क T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकण्याची अप्रत्यक्ष धमकीच दिली आहे.
T20 World Cup 2026
आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिल्यानंतर नक्वींचा पारा चढला आहे. “आयसीसी दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाही. बांगलादेशवर हा अन्याय आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. पण खरा बॉम्ब तर त्यांनी पुढे टाकला. नक्वी यांनी रोखठोक शब्दांत सांगितलं की, “जर पाकिस्तान सरकारने आम्हाला वर्ल्ड कप खेळू नका असा आदेश दिला, तर आम्ही खेळणार नाही. आयसीसीने मग खुशाल २२ व्या संघाचा शोध घ्यावा.”
आम्ही आयसीसीपेक्षा आमच्या सरकारला बांधील आहोत, असं म्हणत त्यांनी या प्रकरणातील चेंडू आता सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. बांगलादेशने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळली. अखेर बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडला आणि आता स्कॉटलंडला संधी मिळाली आहे.
मोहसीन नक्वी आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांच्यातील हे शीतयुद्ध नवीन नाही. याआधी आशिया कपच्या ट्रॉफीवरूनही मोठा ड्रामा झाला होता. भारतीय संघाने नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ते ट्रॉफी घेऊन निघून गेले होते. आता बांगलादेशच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाकिस्तान पुन्हा एकदा भारताच्या विरोधात वातावरण निर्मिती करतोय का, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडेंची ‘ती’ इच्छा अखेर पूर्ण; रोहित शर्मालाही डॉक्टरेट, पुण्यात दोघांचा मोठा सन्मान!
- सोनालीच्या ‘त्या’ ॲटीट्यूडवर रितेश देशमुख भडकला; म्हणाला, ‘पुढच्या वेळी थेट घराबाहेर…’
- लग्नाच्या दिवशी हॉटेलमध्ये राडा, टीम इंडियाच्या पोरींनी पलाशला धुतलं? वकिलांनी मागितला थेट ‘पुरावा’!













