🕒 1 min read
Sanju Samson | टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने आजवरची सर्वात मोठी धावसंख्या यशस्वीपणे पार करत नवा इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजने दिलेले १९६ धावांचे महाकाय आव्हान भारताने अतिशय शानदार पद्धतीने पूर्ण केले. या ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाने T20 World Cup च्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला आहे. आता ५ मार्चला मुंबईत भारताचा महामुकाबला बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा यशस्वी रनचेस ठरला आहे. याआधी २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेने आणि २०१६ मध्ये इंग्लंडने असा मोठा पराक्रम केला होता. भारताने आजवर कधीच इतके मोठे लक्ष्य गाठले नव्हते.
या रोमहर्षक विजयाचा खरा हिरो ठरला तो संजू सॅमसन! त्याने नाबाद ९७ धावांची खेळी करत सर्वांची मने जिंकली. सुरुवातीला विकेट्स पडत असताना त्याने तिलक वर्मासोबत केलेली भागीदारी विजयासाठी अत्यंत निर्णायक ठरली.
सामनावीर (Player of the Match) पुरस्कार स्वीकारताना संजूने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. तो म्हणाला, “देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिल्यापासून मी या एका दिवसाची वाट पाहत होतो. माझ्या प्रवासात अनेक चढ उतार आले, मी स्वतःवर खूप शंका घेतली.”
संजू पुढे म्हणाला, “पण धोनी, विराट आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांकडून मी खूप काही शिकलो.” दिग्गज खेळाडू परिस्थितीनुसार आपला खेळ कसा बदलतात, हे पाहून आपण स्वतःमध्ये सुधारणा केल्याचे त्याने स्पष्ट केले. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असल्याचेही त्याने नमूद केले.
दरम्यान या गटात दक्षिण आफ्रिका ६ गुणांसह पहिल्या स्थानावर राहिला आहे. भारतीय संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे दमदार खेळ करूनही वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे विश्वचषकातील आव्हान आता संपुष्टात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










