🕒 1 min read
मुंबई: केंद्र सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयावरून महाराष्ट्रात तीव्र राजकीय वातावरण तापले आहे. ५ जुलै रोजी याविरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील मोर्चा निघणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या निर्णयाविरोधात काँग्रेसची ठाम भूमिका मांडली. भाजपने हा निर्णय मागे घ्यावा लागेल, असा विश्वासही सपकाळ ( Harshwardhan Sapkal ) यांनी व्यक्त केला.
सपकाळ यांच्या मते, “भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकत्रित अजेंडा आहे की, आठव्या परिशिष्टातील सर्व मातृभाषांना चिरडून टाकावे. हिंदी, हिंदू आणि हिंदुराष्ट्र हा अजेंडा राबवण्यासाठीच ही खेळी खेळली जात आहे.” काँग्रेसने १७ एप्रिलपासूनच या विरोधात भूमिका घेतली होती, असे सपकाळ यांनी सांगितले. त्यानंतर शासनाने निर्णय रद्द केल्याचे भासवत, प्रत्यक्षात शब्दच्छल करून तो तसाच लागू केल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर काँग्रेसने पुन्हा आंदोलनात्मक भूमिका घेत, हा निर्णय रद्द करण्यास भाजप सरकारला भाग पाडू, असा निर्धार व्यक्त केला.
Harshwardhan Sapkal Congress supports Thackeray
सपकाळ म्हणाले, “हा सांस्कृतिक रक्षणाचा मुद्दा आहे. भारतीय जनता पार्टी आणि इतर काही पक्ष भारत-पाकिस्तान करण्यात फार पटाईत आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, नागरिक, सर्वांनी एकत्र येऊन याचा विरोध करावा, असे आमचे आवाहन होते.”
जयंत पाटील यांनी काल पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसचा या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादीच्या सहभागाचे स्वागत आहे. हे काही लग्न नाही की निमंत्रण मिळाले का नाही, हे पाहायला. हा सर्वांनी मिळून करावा असा उपक्रम आहे. अद्याप काँग्रेसशी कोणी संपर्क साधला नसला तरी, संपर्क साधल्यास त्याचे स्वागतच असेल, असेही त्यांनी ( Harshwardhan Sapkal ) स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या आंदोलनाला राजकारण म्हटले आहे. यावर उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, “मराठी चिरडून टाकणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा लागू करणं हेच राजकारण भाजप करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांचे मित्रपक्ष असलेले महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्री या निर्णयाला चुकीचे ठरवत आहेत. मात्र, दुसरीकडे भाजपची भूमिका अजूनही तीच आहे.”
सपकाळ यांनी भाजपला हा निर्णय रद्द करावाच लागेल असा विश्वास व्यक्त केला. अधिवेशनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच ते कदाचित हा निर्णय मागे घेतील, त्यामुळे मोर्चा काढण्याची गरज पडणार नाही, असे चित्र निर्माण होईल, असेही ते म्हणाले. सध्या जो गोंधळ आणि धुरळा निर्माण केला जात आहे, तो नागरिकांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली एक नवीन विधेयक पारित करून घेण्यासाठी असू शकतो, असाही एक नवा मुद्दा सपकाळ ( Harshwardhan Sapkal ) यांनी उपस्थित केला.
भाजपच्या दुटप्पीपणावर सपकाळ यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, “गुजरात भाजपचे नेते हे महाराष्ट्रातील भाजपचे सर्वेसर्वा समजतात. गुजरातमध्ये पहिली ते तिसरी केवळ गुजराती आणि चौथीपासून हिंदी शिकवली जाते. तर फडणवीस मात्र महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी सक्ती करत आहेत. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे.”
महानगरपालिका निवडणुका तोंडावर असल्याने आणि सध्या भाजप बॅकफुटवर गेल्याने, या निर्णयावर भाजपला घुमजाव करावेच लागेल, असेही संकेत सपकाळ ( Harshwardhan Sapkal ) यांनी दिले.
📌 महत्वाच्या बातम्या
- पंढरपूरमध्ये लाखोंच्या रांगेतही आमदार संतोष बांगर यांना २१ कार्यकर्त्यांसाठी हवं VIP दर्शन
- “पाच वर्षे चेअरमन मीच होणार”; माळेगाव विजयानंतर अजित पवारांची तुफानी फटकेबाजी
- “मी गर्लफ्रेंडला गुपचूप हॉटेलमध्ये आणायचो”; शिखर धवनचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












