मुंबई । महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील ( Satej Patil ) यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सरकारने या महामार्गावर होणाऱ्या प्रचंड खर्चाऐवजी मार्गातील मंदिरांच्या विकासावर भर द्यावा, अशी मागणी केली.
राज्यपालांच्या अभिभाषणात शक्तिपीठ महामार्गाचा उल्लेख करताना विकासाचा दावा करण्यात आला. मात्र, हा महामार्ग केवळ टोलवसुलीसाठी कसा उपयुक्त ठरेल, याबाबत शंका उपस्थित करत पाटील यांनी समृद्धी महामार्गाचा दाखला दिला. त्यांनी स्पष्ट केले की, या महामार्गावर अपेक्षित टोल मिळालेला नाही. तरीही 86 हजार कोटी रुपयांचा नवीन महामार्ग उभारण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.
सतेज पाटील ( Satej Patil ) यांनी महामार्गावरील शक्तीपीठे आणि मंदिरांच्या विकासासाठी प्रत्येक स्थळाला 5-5 हजार कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली. यामुळे भाविकांना अधिक सुविधा मिळतील आणि तिर्थक्षेत्रांचा विकास होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांची फसवणूक का?- Satej Patil
शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो शेतकऱ्यांना जमिनीतून बेदखल केले जात आहे. राज्यातील 27 हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकून सरकार हा प्रकल्प राबवू इच्छित आहे का, असा सवाल करत त्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. महामार्ग रद्द झाल्याचा वटहुकूम आधीच निघाला असताना तो पुन्हा राबवला जात आहे, हे नागरिक आणि शेतकऱ्यांची फसवणूक नाही का, असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. राज्यभरातील शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तरीही राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचा समावेश करण्यात आला, ही खेदजनक बाब असल्याचे सांगत पाटील ( Satej Patil ) यांनी या धोरणावर आक्षेप नोंदवला.
महत्वाच्या बातम्या