मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यूबाबत महत्त्वपूर्ण आदेश देत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश दिले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत नव्याने चौकशी करण्याची आणि एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली होती.
या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करेल. न्यायालयाच्या या आदेशानंतर दिशाच्या वडिलांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायालयाने असे निर्देश दिले की, या टप्प्यावर कोणालाही आरोपी मानले जाऊ नये, केवळ जबाब नोंदवले जावेत आणि तपास पूर्ण करून योग्य निष्कर्ष काढल्यानंतरच दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले जावे.
Disha Salian CBI probe
८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड भागात एका इमारतीवरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला. ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचेही निधन झाले. या दोन्ही घटनांमुळे मोठी चर्चा झाली आणि विविध दावे-प्रतिदावे केले गेले.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’ (ADR) केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास केला. या तपासात ही आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सतीश सालियन यांनी या निष्कर्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुलीची हत्या झाली असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाच्या फेरतपासाची मागणी केली.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने तपास प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः, मृताच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त करून आणि अधिकृत तक्रार दाखल करूनही पोलिसांनी एफआयआर (FIR) का नोंदवला नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली.
इतकी वर्षे उलटूनही ‘एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’ (ADR) आणि शवविच्छेदन अहवालाच्या प्रती कुटुंबीयांना का दिल्या गेल्या नाहीत, यावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मृत व्यक्ती चौदाव्या मजल्यावरून खाली पडली होती, या पोलिसांच्या दाव्याशी शवविच्छेदन अहवालात नमूद केलेल्या जखमा कशा जुळतात, याचा खुलासाही न्यायालयाने मागितला.
दरम्यान, उच्च न्यायालयात शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसताना केवळ राजकीय हेतूने त्यांना दिशा मृत्यू प्रकरणात ओढले जात आहे. संबंधित सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपचा स्मृतीभ्रंश झाला असावा’; नारी शक्ती वंदन आंदोलनावर रोहित पवारांची खोचक टीका
- छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची धाड, १ लाखाचा गांजा जप्त
- गेवराई तांड्यात पोलिसांची मोठी धाड; घरात लपवलेला गुटख्याचा साठा उघडकीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











