Eknath Shinde: परभणीत आज नेमकं काय घडणार, याचीच धाकधूक सर्वांना होती. आणि शेवटी ज्याची भीती होती, तेच घडलं! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही खासदार संजय (बंडू) जाधव यांचा शेतकरी मेळावा आज पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेल्या या मेळाव्यात मोठा राडा झाला.
मंचावर खासदार संजय जाधव यांचं भाषण रंगात आले असताना, अचानक कार्यक्रमस्थळी असलेल्या काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी आंदोलकांना थेट सभास्थळावरून बाहेर काढलं. सध्या तिथे परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आलीय.
मनोज जरांगे यांचा मुंबईत ‘हिशोब’ चुकवण्याचा इशारा
हा सगळा वाद सुरू झाला तो जरांगे यांच्या एका फोनवरून. मेळावा रद्द करण्यासाठी जरांगेंनी जाधवांना थेट अल्टीमेटम दिला होता. पण जाधवांनी शेवटच्या क्षणी माघार घेण्यास नकार दिला. “१५ दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. लोक येऊन बसलेत. तुम्ही मला रात्री जरी सांगितलं असतं, तरी मी कार्यक्रम रद्द केला असता,” असं स्पष्टीकरण जाधवांनी दिलं. जरांगेंच्या भावनांचा आदर आहे, पण ऐनवेळी आणि लोक जमल्यानंतर कार्यक्रम रद्द करणं शक्य नसल्याचं ते म्हणाले.
दुसरीकडे, जाधवांच्या या भूमिकेमुळे जरांगे प्रचंड संतापले. त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत जाधवांवर हल्लाबोल केला. “मराठ्यांनी तुला उभं केलंय, हे विसरू नकोस. कार्यक्रम घेणं हे तुझं अस्तित्व नाही, तर मराठा समाज सांभाळणं हे तुझं अस्तित्व होतं,” अशा शब्दांत त्यांनी जाधवांना सुनावलं. बंडू जाधव हा सगळ्यात थर्ड क्लास माणूस असल्याचं म्हणत, ५०० गुंडांच्या जीवावर राजकारण चालत नसल्याचा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून जाधवांनी शिंदेंना अडचणीत आणल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. सध्या प्रशासनाने परभणीच्या सीमा सील केल्यात, त्यामुळे तिथे ताकद वाया घालवण्यापेक्षा थेट मुंबईत जाऊन बोकांडी बसू, असा आक्रमक पवित्रा जरांगेंनी घेतलाय. १२ सप्टेंबरला पुढची दिशा ठरणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ते काही संत नाही… त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा’; दास, रंका आणि दिपकेंबद्दल सोनम वांगचुक यांचा मोठा गौप्यस्फोट
- ‘शिंदेंसोबत वेळ जुळल्यासच परभणीत येणार’; बंडू जाधवांवर भडकलेल्या मनोज जरांगेंचा थेट इशारा
- ‘तू थर्ड क्लास माणूस, तुझी परतफेड मुंबईत करणार’; परभणीच्या मेळाव्यावरून मनोज जरांगेंचा बंडू जाधवांवर घणाघात












