Ashish Shelar | “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची..”; आशिष शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल 

Ashish Shelar | मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. भर पावसात संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत 12 किलोमीटरचा टप्पा पार केला. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

“देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले! याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची शकले उडाली.. “याच भल्या” कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात, तर तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची!” अशा आशयाचं ट्विट आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, पदयात्रेच्यावेळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी माझ्यासाठी रेनकोटची व्यवस्था केली. ते सुरुवातीला मला त्यांच्यात अंगातील रेनकोट काढून देत होते. मी नको नको म्हणत असतान त्यांनी गाडीतून दुसरा रेनकोटही मागवला. मात्र, मी पावसात चालायची तयारी दाखवली आणि आम्ही पुढे चालू लागलो. महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मी राहुल गांधी यांच्याकडे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा नेता म्हणून पाहतो, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) रिंगणात उतरेल, असेही सांगितले.

महत्वाच्या बातम्या :