मुंबई: महायुती सरकारने आणलेल्या ‘महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४’ विरोधात विरोधी पक्षांनी आणि विविध संघटनांनी जोरदार एल्गार पुकारला आहे. हे विधेयक कामगार, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी आणले असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. जर हे विधेयक बहुमताच्या बळावर सभागृहात मंजूर केले गेले, तर रस्त्यावरची तीव्र लढाई अटळ असेल, असे ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठणकावून सांगितले.
जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या वतीने सोमवारी आझाद मैदानावर या विधेयकाविरोधात भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह माकप आमदार विनोद निकोले, शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील, सुनील भुसारा, कॉ. भाकपचे सुभाष लांडे, कामगार नेते काशिनाथ नखाते, उल्का महाजन आणि मेकॅनिक डाबरे यांसारखे अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Uddhav Thackeray Warns Govt Over Public Safety Bill Protests
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “पहलगाम हल्ल्यानंतर जन सुरक्षा विधेयक आणत आहात. राजकीय विरोधकांना तुरुंगात पाठवण्याची स्वप्ने तुम्ही पाहत आहात. मग, पहलगामचे अतिरेकी कुठे गेले? ते भाजपमध्ये गेले का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. भाजपमध्ये जाणारे साधू-संत आणि भाजपविरोधात बोलणारे देशद्रोही, असे चित्र सध्या देशात निर्माण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. “सत्तेची ही मस्ती आम्ही चालू देणार नाही,” असेही ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. देशात गेली १० वर्षे अघोषित आणीबाणीच सुरू असल्याचा आरोप करत, आणीबाणीच्या काळ्या आठवणी सांगणाऱ्या सरकारला त्यांनी (Uddhav Thackeray) आरसा दाखवला.
ठाकरे पुढे म्हणाले, “तुम्ही लढणार असाल, तर शिवसेना तुमच्यासोबत आहे. सभागृहात त्यांच्याकडे बहुमत असेल, पण रस्त्यावर आपली सत्ता आहे. हे लोकशाहीविरोधी विधेयक लागू केल्यास महाराष्ट्रात मोठे जनआंदोलन उभे राहील.” राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्यास कडवा विरोध केला जाईल, असा इशारा देत, आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला तुरुंग कमी पडतील, असेही ठाकरे यांनी सुनावले.
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक सामान्यांच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचे शेकापचे भाई जयंत पाटील यांनी नमूद केले, तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे विधेयक पूर्णपणे लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले. आंदोलन करण्याच्या अधिकारांवर जन सुरक्षा कायदा गदा आणत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- जुलै महिन्यात तुमचा जन्म आहे? मग हे नक्की वाचा, नशिबाची दारं उघडणार!
- ५० हजार कोटींच्या शक्तीपीठ महामार्ग घोटाळ्यात तुमचाही वाटा असेल; राजू शेट्टींचा लोकप्रतिनिधींना थेट इशारा!
- मुंबईत अवजड वाहतूकदारांचा बेमुदत संप; शालेय बसेस, कंटेनर वाहतूक ठप्प, वारकरीही अडचणीत












