Tukaram Mundhe: राज्यातील अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावरून सध्या मोठी खळबळ उडाली असून, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई करत अनेकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. नवी मुंबई, नोएडा आणि दिल्लीत पेप्सीको, नेस्लेसह अनेक बड्या कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये होत असलेला मोठा गैरप्रकार अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) उघडकीस आणला आहे. मुदत संपलेली उत्पादने पुन्हा नव्या तारखा टाकून बाजारात विकणाऱ्या या टोळीचा मुंढेंनी पर्दाफाश केल्याने सामान्य ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
२४ ते २९ ऑगस्ट दरम्यान ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने एफडीएने ही अत्यंत गुप्त आणि मोठी छापेमारी केली. यात तब्बल १० कंपन्या बोगस अन्नपदार्थ विकताना किंवा मुदत संपलेल्या मालाची (Expired Products) पुन्हा पॅकिंग करून विक्री करताना रंगेहाथ सापडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, लेझ (Lay’s), कुरकुरे, मॅगी, नॉर सूप, थम्स अप आणि हेलमन्स मेयोनीज यांसारख्या अत्यंत लोकप्रिय आणि रोजच्या वापरातील ब्रँड्सच्या उत्पादनांवर खोटे स्टिकर्स लावून ग्राहकांची उघडपणे फसवणूक केली जात होती. एक्सपायरी डेट आणि न्यूट्रिशन फॅक्ट्स बदलून हा माल थेट परदेशात पाठवण्याचा या टोळीचा डाव होता. यासाठी त्यांनी चक्क रसायनांचा वापर करून जुन्या तारखा मिटवल्याचंही तपासात उघड झालं आहे.
Tukaram Mundhe: ‘लेबल खोटं बोलतं, तेव्हा किंमत ग्राहकाला मोजावी लागते!’
या धडक कारवाईनंतर राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका मांडली. “जेव्हा एखादं लेबल खोटं बोलतं, तेव्हा त्याची थेट किंमत सामान्य ग्राहकाला आपल्या आरोग्यातून मोजावी लागते. पॅकेटवर छापलेली एक्सपायरी डेट म्हणजे फक्त शाई नसते आणि न्यूट्रिशन लेबल म्हणजे केवळ जुजबी माहिती नसते, तर ती ग्राहकाला दिलेली एक मोठी खात्री असते,” अशा कडक शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे, कायद्याचा केवळ धाक दाखवणं हा या कारवाईमागचा मुख्य उद्देश नसून, प्रामाणिक व्यापाऱ्यांना संरक्षण देणारी एक सुरक्षित व्यवस्था निर्माण करणं हे खरं ध्येय असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं. अन्नपदार्थांच्या लेबलशी छेडछाड करणं हा केवळ नियमांचा भंग नसून, तो लोकांच्या विश्वासाचा आणि आरोग्याचा मोठा विश्वासघात आहे. नवी मुंबईतील ज्या गोदामावर छापा टाकला गेला, तिथे सुमारे ७५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, तब्बल १२ जणांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची दखल आता थेट मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असल्याने, या प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढलं आहे.
थोडक्यात सांगायचं तर, मुंढेंच्या नेतृत्वाखालील या कारवाईचा धडाका फक्त इथवरच थांबलेला नाही. याच आठवड्यात मुंबईतील ‘ईटक्लब ब्रँड्स’ (Eatclub Brands) आणि ‘राणी डायट्स’ (Rani Diets) या दोन मोठ्या कंपन्यांचे परवानेही प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहेत. या ठिकाणी अन्न साठवण्याची अत्यंत चुकीची पद्धत, कामगारांची अस्वच्छता आणि उंदरांचा सुळसुळाट एफडीएच्या अधिकाऱ्यांना आढळून आला होता. त्यामुळेच, आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाला आता तुकाराम मुंढेंच्या रडारवरून सुटणं जवळपास अशक्य असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माच्या निवृत्तीवर बीसीसीआयने सोडले मौन! म्हणाले, ‘तुम्हाला आणखी काय हवंय?’
- स्मृती मानधनाचा आशिया चषकात झंझावात! एकाच झटक्यात मोडले २ मोठे जागतिक विक्रम
- जरांगे पाटलांची मंत्र्यांसमोर प्रश्नांची सरबत्ती! कुणबी प्रमाणपत्रातील अडचणींवरून सरकारला थेट सवाल












