🕒 1 min read
पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा चांगलाच गाजत होता. राज्य सरकारने शिक्षण विभागात हिंदी सक्तीचा जो शासन निर्णय (GR) काढला होता, त्यावर मराठी कलाकारांकडून विरोध होत होता. अखेर, रविवारी (२९ जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा वादग्रस्त जीआर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या संदर्भात शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणाही सरकारने केली आहे.
हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्याचे कळताच, अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) एक हृदयस्पर्शी कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘मायबोली’ या शीर्षकाखाली तिने ही कविता सादर केली असून, तिचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Spruha Joshi’s ‘Mayboli’ Poem Goes Viral
ज्ञानोबांची अमृतबोली
ज्ञानाची रसगंगा
मायबोलिच्या उरे अंगणी
आता केवळ दंगा
परंपरेतुन अभंग झाली
अमुची मायमराठी
अभिजात तिचे सौंदर्य देखणे,
कायम अमुच्या पाठी.
परंतु चाले खेळ अनोखा
महाराष्ट्र देशा
अपुल्या डोळ्यासमोर हरवे
आपुलीच हो भाषा.
सत्ताधारी कुणी विरोधी
मोठी राजघराणी
हताश होऊन बघे मराठी
उदास केविलवाणी!
मंत्रालय वा हो न्यायालय
दबकत पाउल टाकी..
अधिक- उणे च्या गणितामध्ये
उरली केवळ ‘बाकी!’
श्रेय लाटुनी मराठिचे
वर उद्धाराच्या बाता
मुळी न वाटे लाज तयांना
नक्राश्रू ढाळता.
राजनीतिच्या पटावरूनी
हलती प्यादी सारी,
उगा उमाळे, कढ हे खोटे
बोलायाची चोरी!
दुस्वासा कुठल्या भाषेच्या
मुळी नसावा थारा
सक्तीने पण होऊन जातो
जीव उगाच बिचारा!
कोणासाठी कोणा कारण
हा कट रचला जातो..
एकशे पाच हुतात्म्यांचा
श्वास पुन्हा गुदमरतो..
मायबोलिच्या पुनरुथ्थाना
असेच काही व्हावे
ज्ञानोबांनी सदेह आता
मराठदेशी यावे!”
स्पृहा जोशी संवेदनशील कवयित्री म्हणूनही ओळखली जाते. ती (Spruha Joshi) अनेकदा सामाजिक विषयांवर आपल्या कवितेतून भाष्य करते. हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर तिने शेअर केलेली ‘मायबोली’ ही कविता अनेकांना भावली आहे. या कवितेत तिने मराठी भाषेबद्दलच्या भावना, तिचे महत्त्व आणि तिचा अभिमान अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- परदेशात नोकरीचे आमिष दाखवून यूट्युबरकडून फसवणूक; संजय विश्वकर्मा गजाआड
- “अधिकाऱ्यांना बांधून सभागृहात आणा!” सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने विधानसभेत खळबळ!
- संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर पलटवार; म्हणाले, “मी १५० दिवस पळून गेलो नाही!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










