Sanjay Raut | “मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत…”; संजय राऊतांची बोचरी टीका 

Sanjay Raut | मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे वंदे भारत एक्स्प्रेस व एमएमआरडीएच्या कामांचे लोकार्पण आज मोदींच्या हस्ते होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर निशाणा साधलाय.

“दिल्लीत संसद सुरू असताना, अनेक महत्त्वाचे विषय सुरू असताना, अदाणीसारख्या विषयांवर विरोधकांनी घेरलं असताना पंतप्रधान मुंबईत येत आहेत. वंदे भारत एक निमित्त आहे. पंतप्रधानांना मुंबई महानगर पालिका जिंकायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे”, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे.

“जोपर्यंत महानगर पालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत राहू शकतो. कारण पालिका जिंकण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रातले भाजपा आणि मिंधे गटाचे लोक असमर्थ आहेत. ते जिंकूच शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले किंवा इतर राज्यांत त्यांनी लावला तसा आख्खा देश जरी इथे लावला, तरी मुंबई महानगर पालिका शिवसेना जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळेच आता मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय”, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर देखील टीकास्त्र सोडले.

त्याचबरोबर “कदाचित पंतप्रधान पालिका निवडणूक जिंकेपर्यंत मुंबईत घर घेऊन राहतील. राजभवनात राहतील”, अशी बोचरी टीका देखील संजय राऊत यांनी केलीय. दरम्यान,  पंतप्रधान दौऱ्यावर असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसंच, मुंबईतील काही परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button