🕒 1 min read
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या ( BMC Election ) रणधुमाळीत तिकीट वाटपावरून झालेला राडा, तोडफोड आणि नेत्यांच्या गाड्या अडवल्याचे प्रकार ताज्या असतानाच, भाजप नेतृत्वाने मात्र ‘सगळं काही आलबेल’ असल्याचा सूर आळवला आहे. इच्छुकांचा संताप आणि रस्त्यावर आलेली नाराजी हे चित्र स्पष्ट असताना, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी “पक्षात बंडखोरी आहेच कुठे?” असा प्रतिसवाल केला आहे.
तिकीट न मिळाल्याने अनेक वॉर्डांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला आहे. मात्र, साटम यांनी हा दावा फेटाळून लावला. “दोन-चार ठिकाणचा अपवाद वगळता भाजपमध्ये मोठी बंडखोरी नाही. उलट खरी बंडखोरी तर उद्धव ठाकरे यांच्या गटात आहे,” असा टोला त्यांनी लगावला. भाजपचा कार्यकर्ता हा स्वतःच्या लाभापेक्षा पक्षासाठी आणि हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्यासाठी काम करतो, त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्व बंडखोर माघार घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मात्र, वास्तवात चित्र काहीसं वेगळं आहे. प्रभाग क्रमांक २२५ मध्ये पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनीच बंडाचं निशाण फडकवलं आहे. या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षदा नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नार्वेकर यांच्या कुटुंबातच तीन तिकिटं गेल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. हा असंतोष दाबण्यासाठी सध्या भाजपचे ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू झाले आहे.
निवडणूक प्रभारी आशिष शेलार आणि स्वतः साटम सध्या नाराज नेत्यांचे फोन खणखणत आहेत. बंडखोरांच्या भेटीगाठी आणि मनधरणी सुरू असून, “नाराज झालेले लवकरच शांत होतील,” अशी आशा पक्षश्रेष्ठींना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्त पालिकेचं स्वप्न दाखवत नेत्यांनी बंड शमवण्याचे प्रयत्न चालवले असले, तरी नार्वेकरांच्या होमग्राऊंडवर झालेलं बंड शमणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तिकिटासाठी मारामारी, पण निकालाआधीच भाजपाचा ‘षटकार’; ६ शिलेदार बिनविरोध विजयी!
- “आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते भडकले, सुनील केदारांनी काढला पळ!
- नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












