🕒 1 min read
मुंबई: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून, या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोर्चाला विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “याला मराठी माणूस जाम चोपेल, आमची भाजपला विनंती आहे की, त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी, नाहीतर याच्या तोंडात दात नसतील,” अशा सज्जड शब्दांत जाधव यांनी सदावर्ते यांना इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन करून दोन वेगवेगळे मोर्चे काढण्याऐवजी मराठी माणसाच्या हितासाठी एकच, अभूतपूर्व मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली. हा मोर्चा मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवेल, असेही ते म्हणाले. मात्र, या मोर्चाला सदावर्ते यांनी विरोध करत, राज ठाकरे भाषिक वाद निर्माण करत असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी केली होती. याच मागणीवरून मनसे सैनिक (MNS) चांगलेच संतापले आहेत.
MNS Avinash Jadhav slams Gunratna Sadavarte
“सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे,” असा गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केला. यापूर्वी सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही सदावर्ते यांनी उडी मारल्याची आठवण त्यांनी करून दिली. “एवढीच हिंमत असेल तर जा ना तिकडे साऊथमध्ये. तू स्वतःला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडं जाऊन विरोध करून दाखव. सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. मी खात्रीने सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल,” असा थेट इशारा जाधव यांनी दिला.
हिंदी सक्तीमुळे मुलांच्या भाषिक विकासावर होणाऱ्या परिणामांबाबतही अविनाश जाधव यांनी चिंता व्यक्त केली. “माझा मुलगा चौथीला आहे, सध्या तो बोलताना मराठी आणि हिंदी मिक्स करायला लागला आहे. हा अनेक मुलांच्या बाबतीत होतोय. पहिले वाक्य मराठीत, दुसरे दोन वाक्य हिंदीतले बोलून जातील. हा त्यांच्या मेंदूवर होणारा परिणाम आहे,” असे ते म्हणाले.
“हे सरकारला कळत नाही, त्यांना दिल्लीचे मनसुबे पुढचे आहेत, ते टिकवायचे आहेत. म्हणून हे सर्व चालू आहे, पण आम्ही हे कधीही खरं होऊन देणार नाही,” असे ठामपणे सांगत जाधव यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. मनसे आणि त्यांना पाठिंबा देणारे पक्ष एकत्रितपणे या हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करतील असे त्यांनी स्पष्ट केले. ५ जुलैचा मोर्चा ही पहिली पायरी असून, यापुढे महाराष्ट्रात जे काही विरोध होतील त्याला झेलायला सरकारने तयार राहावे, असा इशाराही त्यांनी दिला.
शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांचाही अविनाश जाधव यांनी उल्लेख केला. शिक्षणमंत्री हिंदीला ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून कसे पुढे रेटत होते, हे त्यांनी सांगितले. “तबला, स्विमिंग अशा अनेक गोष्टी स्कोअरिंग सब्जेक्ट होऊ शकतात, असे राज ठाकरेंनी सुचवले होते. आम्हाला अशा कला क्षेत्रातली एखादी भाषा द्या, हिंदीच का? तुम्ही या सर्व गोष्टी करून हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहात,” असे राज ठाकरेंनी म्हटल्याचे जाधव यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा! टीकेला कंटाळून मेधा कुलकर्णी रडल्या
- मर्सिडीजवाले आणि ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; बावनकुळेंचा मोठा बॉम्ब!
- गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचा ‘पाळीव पोपट’ ते औकाद नाही; राऊत-शेलारांमध्ये तुफान जुंपली!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










