🕒 1 min read
मुंबई: राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मुद्द्यावर एकत्र आले असून, येत्या ५ जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार आहेत. खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमांवर पोस्ट करून ही घोषणा केली, ज्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षात (भाजप) लगेचच प्रतिक्रिया उमटल्या.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यावर भाष्य करताना म्हटले की, “मोर्चा काढणे हा त्यांचा अधिकार आहे. मराठी माणसासमोरच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यात मराठीची सक्ती आहे. भाजप मराठीसाठी कट्टर आहे, मराठीसाठी आग्रही आहे. भाजप आणि केंद्र सरकार यामुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे. कोणीही गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावे. मराठी भाषा अनिवार्य आहे, हिंदी भाषा ऐच्छिक आहे,” असे शेलार यांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut Slams Gunratna Sadavarte and Ashish Shelar
दरम्यान, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. यावर संजय राऊत यांनी तीव्र टीका केली होती. “गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचा पाळीव पोपट आहे,” असे राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले होते. या टीकेलाही आशिष शेलार यांनी उत्तर दिले. “गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आमचा कुठलाही हेतू नाहीये, असा विचार डोक्यात नाही. प्रत्येकाला लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. अंतिमतः निर्णय पोलीस घेतील. चर्चेला आम्ही तयार आहोत, गैरसमजाचे बळी पडू नका,” असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला.
आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडीला त्यांच्याच जुन्या निर्णयांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “२०२२ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली होती आणि त्यातला हिंदी भाषेबाबतचा आयोगाच्या तज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच आला होता. राज ठाकरे यांच्या पक्षालाही आमचे म्हणणे आहे की, काँग्रेसने यावर निर्णय घेतलेला आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या या निर्णयाला शरद पवारांनी पाठिंबा दिला होता,” याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढण्याबाबत पहिले मराठीत ट्विट केले होते. त्यानंतर लगेच त्यांनी इंग्रजीत दुसरे ट्विट करत थेट केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले. “जय महाराष्ट्र” म्हणत, “महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हे ब्रँड आहेत,” असे संजय राऊत यांनी ( Sanjay Raut ) त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांचा फडणवीसांना खोचक टोला: “तुमच्या धमकीमुळे आमची झोप उडालीये!”
- आणीबाणीवरून राऊतांनी भाजपला धुतले! ‘या’ बड्या नेत्याच्या मुलावरून डिवचले
- राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चाची तारीख बदलली; आता ५ जुलैला, ठाकरे गटही सोबत येणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











