🕒 1 min read
नागपूर: नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला, तरी यावरून आता राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेषतः कोल्हापूर, धाराशिव आणि सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर, विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. मात्र, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला पुन्हा गती दिली असून, मंगळवारी (दि. 24 जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.
या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी या प्रकल्पावर जोरदार टीका सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना “यात राजकारण आणाल तर याद राखा!” असा इशाराही दिला होता. या इशाऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
Sharad Pawar on Devendra Fadnavis over Shaktipeeth Expressway
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विषयावर आपले मत मांडले. “शक्तीपीठ महामार्गाचा विषय मला आधी समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांशी मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हाला त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे,” असे पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या “याद राखा” या इशाऱ्यावर पवार यांनी मिश्किलपणे पलटवार केला. “देवेंद्र फडणवीसच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे. आता आमचं कसं व्हायचं?” असा खोचक टोला त्यांनी लगावला. पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना शरद पवार म्हणाले की, “हा प्रकल्प काय आहे, हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का, ते समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली, तर ती देखील मी घेणार आहे.” या प्रकल्पाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलतायेत त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल,” असे पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही,” असे स्पष्ट करत, केवळ राजकीय विरोधासाठी कोणत्याही प्रकल्पाला विरोध करण्याची आपली भूमिका नसल्याचे पवारांनी नमूद केले. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांची आणि विरोधकांची मते विचारात घेऊन काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- आणीबाणीवरून राऊतांनी भाजपला धुतले! ‘या’ बड्या नेत्याच्या मुलावरून डिवचले
- राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चाची तारीख बदलली; आता ५ जुलैला, ठाकरे गटही सोबत येणार?
- दिलजित दोसांजने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्याने नेटकरी तुफान भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












