🕒 1 min read
निवडणुका संपल्या की लाडक्या बहिणींचे महत्त्वही संपले का? राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ज्या योजनेचा संपूर्ण देशात मोठा गाजावाजा केला, त्याच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत (Ladki Bahin Yojana) आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
योजनेतील तब्बल ८० लाख महिलांना तडकाफडकी अपात्र ठरवण्यात आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या मोठ्या प्रशासकीय कारवाईनंतर जळगावातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.
Ladki Bahin Yojana Rohini Khadse
रोहिणी खडसे यांनी जळगावात बोलताना थेट सत्ताधाऱ्यांच्या हेतूवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०२४ मध्ये निवडणुकांच्या तोंडावर सरसकट सर्व महिलांना लाभ देण्याचे आश्वासन दिले गेले होते, त्यामुळेच सुरुवातीला २.४८ कोटी महिलांना यात सामावून घेतले गेले.
त्यामुळेच आता निवडणुका आटोपल्यावर २०२५ मध्ये आधी २६ लाख आणि आता २०२६ मध्ये थेट ई-केवायसीचे (e-KYC) कारण पुढे करून एकूण ८० लाख नावे यादीतून कट करण्यात आली आहेत. यामुळे लाभार्थी संख्या कमालीची घटली असून सध्या ही संख्या १.६८ कोटींवर आली आहे.
“काम सरो आणि वैद्य मरो” अशीच काहीशी अवस्था सध्या या सरकारने करून ठेवावी का, अशा कडक शब्दांत खडसे यांनी आपला संताप व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांच्या परदेशवाऱ्या आणि जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मग गरिबांच्या १५०० रुपयांवरच डोळा का, असा रोकडा सवाल त्यांनी विचारला.
दुसरीकडे, या संवेदनशील मुद्द्यावरून मनसेचे नेते राजू पाटील यांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी करदात्यांच्या पैशांच्या उधळपट्टीकाढून सरकारचा जाहीर समाचार घेतला.
मतांच्या लाचारीसाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सुरुवातीला पात्र-अपात्रतेची पुरेशी खातरजमा न करताच थेट खात्यात पैशांची खिरापत वाटली गेली, असा थेट आरोप पाटील यांनी केला.
अटींची पूर्तता न झाल्याने ८० लाख महिला बाद झाल्या असतील, तर आधी झालेल्या ३०,००० कोटींच्या अतिरिक्त आर्थिक उधळपट्टीला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
या दोन्ही बड्या नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता या योजनेवरून राज्यातील राजकारण पूर्णपणे तापलं आहे. शासन जाणीवपूर्वक बहिणींची संख्या कमी करण्याचे नवे बहाणे शोधत आहे की काय, अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आरसीबी आणि गुजरात फायनलसाठी आमनेसामने, पण पाऊस पडला तर चषक कोणाचा?
- सुपरस्टारच्या आईचं निधन, सांत्वनासाठी त्रिशा कृष्णनसोबत घरी पोहोचले CM थलपती विजय; VIDEO व्हायरल
- “लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली…”, अनिकेत सराफ नेमकं परदेशात काय करतो? आई निवेदिता म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












