🕒 1 min read
२०२६ च्या वर्ल्ड कपची तयारी म्हणता? पण सुरुवात तर अडखळत झालीये! नागपूरच्या मैदानात आज चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी मात्र सुरुवातीलाच निराशा केली. India vs New Zealand यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचे दोन मोहरे अवघ्या ३ ओव्हर्समध्ये गारद झाल्याने स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला आहे.
Ind vs Nz 1st T20 Update
नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. सुरुवातीला संजू सॅमसनने (Sanju Samson) काईल जेमीसनला दोन खणखणीत चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. वाटलं आज संजूची बॅट तळपणार! पण अतिउत्साह नडला. ५ व्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो १० धावांवर झेलबाद झाला आणि १८ धावांवर भारताला पहिला धक्का बसला.
पण खरी खळबळ उडाली ती ईशान किशनच्या (Ishan Kishan) विकेटने. तब्बल ७८५ दिवसांनंतर ईशानला टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये जागा मिळाली होती. ‘आता संधीचं सोनं करेल’, अशी चर्चा फॅन्समध्ये होती. पण झालं उलटंच! जॅकब डफीच्या तिसऱ्या षटकात ईशान ५ चेंडूत फक्त ८ धावा करून माघारी परतला. इतक्या मोठ्या कालावधीनंतर मिळालेल्या संधीचा त्याला फायदा घेता आला नाही, हे पाहून क्रिकेटप्रेमींनी कपाळावर हात मारून घेतला आहे.
“आम्हालाही टॉस जिंकून बॉलिंगच घ्यायची होती,” असं कॅप्टन सूर्यकुमार यादवने टॉसच्या वेळी स्पष्ट केलं होतं. पण आता बॅटिंग आलीये तर आव्हान उभं करावंच लागेल. सध्या टीम इंडियावर दडपण आलं असून, स्वतः सूर्यकुमार यादव मैदानात आहे. या सामन्यासाठी श्रेयस अय्यर, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांना बाकावर बसवण्यात आलं आहे, ही धक्कादायक माहिती सुद्धा टॉस दरम्यान समोर आली.
आता भारताचा डाव सावरण्याची सर्व जबाबदारी सूर्या आणि मिडल ऑर्डरवर आहे. वर्ल्ड कपपूर्वीची ही मालिका असल्याने ईशान आणि संजूचे अपयश टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढवणारे ठरले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Gold Rate : एका दिवसात २५०० रुपयांचा भडका! सोनं दीड लाखांच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या नवा भाव!
- विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच भारताचे गेट वे ऑफ इंडिया; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
- बीसीसीआयचा विराट-रोहितला मोठा धक्का? विराट-रोहित थेट ‘B’ ग्रेडमध्ये?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











