Maharashtra Rain Update- जुलैच्या सुरुवातीला धो-धो कोसळलेला पाऊस अचानक गायब झाला आणि बळीराजाच्या काळजात अक्षरशः धडकी भरली. आता दोन-तीन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली असली, तरी यंदा अल निनो खरोखरच आपला डाव साधणार का? हा प्रश्न कायम आहे.
राज्याच्या काही भागात पहिल्याच आठवड्यात पावसाने पूरस्थिती आणली, तर त्यानंतर सलग १०-१२ दिवस ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळालं. आता पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पण खऱ्या अर्थाने यंदा पावसाचं गणित कसं असेल आणि अल निनोचा नेमका काय परिणाम होईल, यावर हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी थेट भाष्य केलं आहे.
Maharashtra Monsoon | यंदा पाऊस कमी, पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चित्र बदलणार?
प्रा. चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे २०२६ वर्ष कमी पावसाचं ठरणार आहे. यामागे हवामान बदल आणि अल निनोचा वाढता प्रभाव ही मुख्य कारणं आहेत. दुसरीकडे, अरबी समुद्र आणि हिंदी महासागराचं तापमान वाढल्याचाही फटका या मान्सूनला बसतोय.
पण मग जुलैच्या पहिल्या आठवड्यात एवढा पाऊस कसा झाला? याचं उत्तर देताना चोपणे स्पष्ट करतात की, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र राज्याच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळेच अल निनोचं सावट असलं तरी अनेकदा चांगला पाऊस पडतो. याच कारणामुळे जुलैच्या सुरुवातीला मुंबई, कोकण आणि पूर्व मध्य महाराष्ट्रात २०० ते २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पण यंदा सतत पाऊस कोसळत राहणार नाही. आठवड्यातून केवळ दोन-तीन दिवसच पाऊस पडेल.
सध्या जुलै महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. पण खऱ्या अर्थाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्याच्या जवळपास सर्वच भागात पाऊस पुन्हा एकदा चांगला वेग घेईल. असं असलं तरी, यंदा सरासरीपेक्षा थोडा कमीच पाऊस पडेल, असा स्पष्ट अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘कोणाला सीता बनवलात?’; ‘रामायणम्’ सिनेमात साई पल्लवीच्या कास्टिंगवरून दिग्गज अभिनेता भडकला
- फेसबुकवरील ‘रशियन’ तरुणीची मैत्री पडली महागात; गोड बोलून ५६ वर्षीय व्यक्तीला ७ लाखांचा चुना
- ४००० कोटींच्या ‘रामायण’चा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले पडद्यावरून सुटलेला बाण….













