नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी, राजधानी दिल्लीत आंदोलने आणि पोलिसांचा लाठीचार्ज (Lathicharge) झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण आणि वाढती बेरोजगारी यांविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) पुकारलेल्या ‘चलो संसद’ या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वीच जंतर-मंतर येथे मोठा गदारोळ झाला.
आंदोलक संसदेकडे कूच करण्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी लाठीचार्जला सुरूवात केली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर-मंतरकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’च्या (AAP) अनेक नेत्यांना पोलिसांनी वाटेतच अडवले. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या काही नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार आणि बेरोजगारीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी देशभरातील विद्यार्थी आणि पालक काल संध्याकाळपासूनच दिल्लीतील जंतर-मंतर येथे जमू लागले होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन आज सुरू होत असल्याने, त्या पार्श्वभूमीवर आज आंदोलनाचा एक भाग म्हणून मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली आहे.
जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना परिसरातील एका ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि सुरू असलेली आंदोलने लक्षात घेता, नवी दिल्ली परिसरात ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. डीसीपी सचिन शर्मा यांच्या माहितीनुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र जमण्यावर, निदर्शने करण्यावर आणि मिरवणुका किंवा मोर्चे काढण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. केवळ पूर्वपरवानगी घेऊन जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल आणि त्यांना थेट तुरुंगात पाठवले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपकेंच्या ‘संसद चलो’ मोर्चाला पोलिसांचा ब्रेक? दिल्लीत कलम १६३ लागू, अन्यथा थेट कारवाईचा इशारा
- मोठा राजकीय ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना पूर्णविराम
- अल निनोचा धोका खरंच टळलाय का? हवामान तज्ज्ञांचा यंदाच्या पावसाबाबत सर्वात मोठा अंदाज













