दिल्ली: देशाच्या राजधानीत, दिल्लीतील जंतरमंतरवर एका विद्यार्थिनीच्या वडिलांवर झालेल्या भयंकर हल्ल्याने सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात स्वत:ला ‘कट्टर हिंदू’ म्हणवणाऱ्या स्वतंत्र भारद्वाज या व्यक्तीने एका व्हायरल व्हिडीओमध्ये हा हल्ला केल्याची जाहीर कबुली दिली होती. या उघड गुंडगिरीनंतर आता ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) वाढत्या दबावामुळे, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपीला येत्या ७२ तासांत अटक करण्याचं ठोस आश्वासन दिलं आहे.
विद्यार्थी कार्यकर्ती निशू आझाद हिचे वडील संजय कुमार यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी हा केवळ किरकोळ वाद असल्याचा दावा करत आरोपींना फक्त नोटीस देऊन सोडून दिलं होतं. पण दुसरीकडे, आरोपी भारद्वाज याने एका मुलाखतीत आपण संजय कुमार यांची ‘कवटी फोडली’ असल्याचा अत्यंत धक्कादायक दावा केला. त्यामुळे संतापलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांनी आणि खासदार चंद्रशेखर आझाद, पप्पू यादव यांनी थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यावर धडक देत कारवाईची मागणी लावून धरली.
‘माझ्या पाठीशी मोठे नेते’
आरोपीच्या दाव्यांनी वाढला राजकीय तणाव, पोलिसांवर कारवाईचा दबाव
या सर्व धक्कादायक प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी निशू हिला सोशल मीडियावरून बलात्कार आणि ॲसिड हल्ल्याच्या गंभीर धमक्या येऊ लागल्या आहेत. आपण भीतीने घराबाहेर पडणे आणि शाळेत जाणेही सोडून दिल्याचे तिने माध्यमांना सांगितले. याप्रकरणी CJP चे सह-समन्वयक सौरव दास आणि काँग्रेसच्या विधी विभागाचे प्रतिनिधी ऋषभ यांनी पोलिसांवर दबाव आणला. त्यांनी आरोपीवर खुनाचा प्रयत्न (Attempt to murder), ॲट्रॉसिटी (SC/ST Act) आणि गुन्हेगारी धमकावणे यांसारखी कडक कलमे लावण्याची आक्रमक मागणी केली. पोलिसांनीही या मागण्या मान्य करत वेगळा एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
नगीना मतदारसंघाचे खासदार आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिल्ली पोलिसांच्या या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली आहे. “आरोपी उघडपणे टीव्हीवर येऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे आणि पोलीस त्याला केवळ नोटीस देऊन सोडतात, हे अत्यंत संतापजनक आहे,” अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. जर राजधानी दिल्लीत ही अवस्था असेल, तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, आरोपी स्वतंत्र भारद्वाज याने युट्यूबवर दिलेल्या मुलाखतीत अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावे घेतल्याने हे प्रकरण आणखीनच तापले आहे. ‘कपिल मिश्रा आणि चिराग पासवान हे माझे मोठे भाऊ आहेत, त्यांच्या एका फोनवर मला सोडण्यात आले,’ असा खळबळजनक दावा त्याने केला आहे. त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी CJP कडून करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर, येत्या ७२ तासांत पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास पुन्हा एकदा पोलीस ठाण्यावर धडक देण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिषेक शर्माला युवराज सिंगची भन्नाट ‘शिक्षा’; वाढदिवशी कॅमेऱ्यासमोर काढल्या उठाबशा, व्हिडीओ चर्चेत
- सलमान खानचा मैत्रिणीला थेट इशारा, ‘कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन’; नेमकं प्रकरण काय?
- समीर चौघुले अन् सचिनची पहिली भेट; ‘क्रिकेटच्या देवाला’ पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











