Weather Update | राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. तर, धुळ्यामध्ये गारपीटीमुळे उभी पिकं आडवी झाली आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

या बदलत्या हवामानामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये सोमवारी संध्याकाळी आणि रात्री उशिराने सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. या परिसरातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Update) वर्तवण्यात आला आहे.

राज्यामध्ये येत्या बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या अवकाळी पावसाने परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना चांगलंच झोडपलं आहे. या पावसामुळे काही भागात आंब्याचा मोहर गळून पडला आहे. तर मोसंबी, डाळिंब या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुण्यामध्ये होळीची धूम सुरू असताना अचानक वादळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पेटवलेल्या होळीला झाकण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली होती. शहरातील मध्यवर्ती भागात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पुण्यामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुणेकरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.