🕒 1 min read
पुणे – उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रासाठी सध्या सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी कोणती असेल? तर ती म्हणजे मान्सूनची दमदार वाटचाल. केरळमध्ये हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने गोव्यात धडक दिली आहे आणि तो थेट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन पोहोचला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मान्सूनच्या (Monsoon) पुढील प्रवासासाठी वातावरण अत्यंत अनुकूल बनले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत तो अधिकृतपणे राज्यात प्रवेश करेल. मोसमी वारे वेळेत दाखल होण्याचा अंदाज असल्याने बळीराजा सुखावला आहे.
मान्सून अपडेट्स: सिंधुदुर्ग आणि परभणीत पावसाची दमदार हजेरी
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने आधीच आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळसह काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तिथे हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून १० ते २० मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यातही पावसाने सुखद धक्का दिला. परभणीत अचानक विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला. रस्त्यांवर पाणी साचले असले तरी आगामी पावसाळ्याची चाहूल लागल्याने समाधानाचे वातावरण आहे.
यंदा मान्सूनचा प्रवास सुरुवातीला थोडा रेंगाळला. नेहमी १ जूनला केरळात येणारा मान्सून यंदा तीन दिवस उशिरा आला. हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी स्पष्ट केले की, पुढील ४८ तासांत कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पाऊस दाखल होईल. विदर्भात मात्र अजून काही दिवस तापमान ४० ते ४२ अंशांच्या घरात राहील आणि १० जूननंतर तिथे उष्णतेची लाट ओसरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘तुझं आजारपण प्रसिद्धीसाठी वापर, माझ्यावर भुंकू नकोस’; शिल्पा शिंदेचा हिना खानवर संताप
- स्वयंपाकघरात शेजाऱ्याचा मृतदेह अन्..; ओटीटीवर माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ नव्या सिनेमाने उडवली खळबळ!
- कंगनाची ‘ती’ पोस्ट शेअर केली अन् गिरीजा ओकचे हजारो फॉलोअर्स घटले; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












