दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, परंतु दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत आहे. आज कामकाज थांबल्यानंतर, पत्रकारांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना संसदेबाहेरील परिस्थितीबद्दल प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “तुम्ही नेहमी सरकारला हवे असलेलेच प्रश्न विचारता. हेच प्रश्न सरकारला का विचारत नाही?” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
प्रियांका गांधी का संतापल्या?
संसदेतून बाहेर पडताच पत्रकारांनी त्यांना कामकाज का थांबले आहे? याबद्दल विचारणा केली. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “”तुम्ही नेहमी सरकारला हवे असलेलेच प्रश्न विचारता. हेच प्रश्न सरकारला का विचारत नाही? मंत्री बाहेर येऊन बोलत आहेत, पण पंतप्रधान मात्र एकदाही संसदेत फिरकलेले नाहीत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करत आहेत, तरीही पंतप्रधानांनी संसदेत त्याबद्दल एक शब्दही काढलेला नाही आणि तुम्ही मला विचारताय की संसदेचे कामकाज का थांबले आहे?”
सरकारला प्रश्न विचारा
त्या पुढे म्हणाल्या, “मला विचारा, की विद्यार्थ्यांसाठी काय केले जात आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार कोणती पावले उचलत आहे? हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत. जेव्हा मंत्री प्रसारमाध्यमांसमोर येतात, तेव्हा त्यांनाही विचारा. ‘तुम्ही राजीनामा कधी देणार आहात?’ तुम्ही हा प्रश्न विचारला का? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा कधी देणार आहेत, हे तुम्ही त्यांना विचारले का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारले का की पोलिसांनी लाठीचार्ज का केला? इतक्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात का दाखल करावे लागले? आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची इंटरनेट सेवा का बंद केली गेली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पालकांशी संपर्क साधणेही अशक्य झाले? ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ (NSA) का लागू केला गेला? हे विद्यार्थी दहशतवादी आहेत का? जेव्हा तुम्ही सरकारला हे प्रश्न विचारायला सुरुवात कराल, तेव्हाच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन.” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- MPSC परीक्षेत मोठा बदल! कसा असेल नवा पेपर पॅटर्न? आयोगाची मोठी अपडेट
- ‘रस्त्यावर नव्हे, संसदेत चर्चा करा’; CM फडणवीसांचे राहुल गांधींना थेट आव्हान
- ‘अनफॉलो करा पण…’; CJP आंदोलनावर अंकिता वालावलकरचा संताप, बॉलिवूडला विचारला खडा सवाल













