Devendra Fadnavis | शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया; काय होतील युतीचे परिणाम?

Devendra Fadnavis | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. यानंतर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याने राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. त्यातच आता या दोघांच्या युतीचा राज्याच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर किती परिणाम होईल, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी या युतीबाबत भाष्य केले आहे.

“या युतीने फार परिणाम होईल, असं मला वाटत नाही. याचं कारण म्हणजे ही आघाडी केवळ भाजपला विरोध म्हणून झाली आहे. अन्यथा प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्या विचारात खूप अंतर आहे. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं तेव्हा भाजपने त्याला पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेने नामविस्ताराचा विरोध केला होता”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मंडल आयोग आला तेव्हा भाजपने आरक्षणाचं समर्थन केलं, मात्र शिवसेनेने त्याचा विरोध केला होता. सर्वच प्रकारचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावर करावं अशाप्रकारची शिवसेनेची सातत्याने मागणी राहिली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आरपीआयची आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्याच्याविरोधात शिवसेनेची भूमिका आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे.

“अशा नामाविस्तार आणि आरक्षणविरोधी शिवसेनेबरोबर प्रकाश आंबेडकरांना जावं लागतं. याचा अर्थ भाजपाला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार आहे,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे-आंबेडकरांना लगावला आहे.

“मला वाटतं जनतेला हे समजतं. प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडणूक लढले आणि ते काही जिंकून येऊ शकले नाही. आता त्यांना असं वाटतं की शिवसेना बरोबर आली तर कदाचित हिंदुत्ववादी मतं आपल्याबरोबर येतील. मात्र, त्यांना माहिती नाही की, हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या