Bharat Gogawale | “उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाचा पक्ष संघटनेत हस्तक्षेप”; भरत गोगावलेंचा गंभीर आरोप

Bharat Gogawale | मुंबई : राज्यात शिवसेनेच्या वादाची मोठी चर्चा सुरु आहे. शिवसेना फुटीवरुन अनेक राजकीय नेते मंडळींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच आता शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी शिवसेना फुटीचे कारण सांगत असताना माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

त्यांची थेअरी आम्हाला वेगळी वाटली

“आम्ही वारंवार उद्धव साहेबांकडे आमच्या अडचणी, कार्यकर्त्यांचे प्रश्न, मतदारसंघातील समस्या घेऊन जात होतो, पण त्यावेळी उद्धव साहेबांची थिअरी आम्हाला वेगळी वाटली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल आम्ही जेव्हा जेव्हा तक्रार करायचो, तेव्हा ते त्याकडे गांभीर्याने पाहत नसत”, असे भरत गोगावले यांनी सांगितले आहे.

“उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाचा पक्ष संघटनेत हस्तक्षेप” 

“कोणताही निर्णय घेत नसत. मग हळूहळू आमच्या भावना तयार होत गेल्या की, यांना आमची गरज नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि माझं कुटुंब एवढ्यापुरतंच ते मर्यादीत राहिले होते. तसेच उद्धव साहेबांच्या घरच्यांचे पक्ष संघटनेत हस्तक्षेप व्हायला लागले. त्यांचे मेव्हणे, भाचे आणि वहिनी कळत-नकळत हस्तक्षेप करत होत्या”, असा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे.

“उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेला बदल लोकांना देखील जाणवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयात माँसाहेबांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. उलट माँसाहेबांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिलं. म्हणून माँसाहेबाप्रती शिवसैनिकांचा आई-वडीलांपेक्षाही जास्त आदर तयार झाला”, असेही भरत गोगावले म्हणाले आहेत.

“याचं कुठेतरी चिंतन करायला हवं”-Bharat Gogawale

“उद्धव ठाकरे यांच्याबद्दल द्वेष निर्माण होण्याची कारणं तपासली पाहीजेत. एक किंवा दोन नाही तर तब्बल 40 आमदार, 13 खासदार, शेकडो नगरसेवक, हजारो कार्यकर्ते आज त्यांच्यापासून बाजूला होत आहेत. तेही सत्ता असताना पक्षाला सोडून गेले, याचे कुठेतरी चिंतन करायला हवं”, असंही भरत गोगावले म्हणाले आहेत.

“बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना निश्चितच कार्याध्यक्ष करुन वारसदार ठरविले होते. पण ते त्यांचा वारसा कितपत चालवतील, याची कल्पना बाळासाहेबांना तेव्हा नव्हती, उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर नारायण राणे, गणेश नाईक आणि अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले, तेव्हा साहेबांनाही याची प्रचिती आली होती. त्यामुळे याचे आत्मचिंतन करणे गरजेचे होते”, असे भरत गोगावले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-