🕒 1 min read
राळेगणसिद्धी– माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्याचा सरकारचा डाव असल्याच्या चर्चा सुरू आहे. यामुळे राजकारण तापलं असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट फडणवीस सरकारला मोठा इशारा दिला आहे.
येत्या ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा थेट ‘अल्टीमेटम’ त्यांनी दिला आहे. १२ जून २०२६ रोजी माहिती अधिकार कायद्यात (RTI) करण्यात आलेले नवे बदल तातडीने मागे घ्यावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
Anna Hazare RTI Protest
फडणवीस सरकारने आरटीआय अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी नव्याने शुल्कवाढ केली आहे. दुसरीकडे, ओळखपत्राची सक्ती आणि ‘एक विषय-एक अर्ज’ यांसारख्या जाचक अटी लादल्या आहेत.
या नव्या १२ बदलांमुळे सर्वसामान्यांचा हक्क हिरावून घेतला जात असून हा कायदाच कुचकामी ठरेल, असा दावा अण्णांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे नियम तातडीने रद्द करण्याची मागणी केलीय.
मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत अण्णांची नुकतीच चर्चा झाली. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत ते स्वतः राळेगणसिद्धीला जाऊन अण्णांची भेट घेणार आहेत. या बैठकीत प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढला नाही, तर ५ जुलैपासून बेमुदत उपोषण अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे माहिती अधिकार कायद्यावरून सरकारला धारेवर धरताना, दुसरीकडे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या खासदारांवरही अण्णांनी जोरदार प्रहार केला. “ज्यांच्याकडे ध्येयवाद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ आहे, ते कधीच आपला पक्ष बदलत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी या नेत्यांना फटकारलं.
निष्ठा आणि श्रद्धा गुंडाळून ठेवून केवळ स्वतःचा स्वार्थ साधणारेच लोक असा पक्ष बदल करतात, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. आजच ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “त्यांना ताकदवान नेते नकोत, गुलाम हवेत”; शिंदेंच्या गटात जाताच संजय दिना पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
- उद्धव ठाकरेंसोबत भास्कर जाधव किती दिवस टिकणार? संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट
- सुपर अल-निनो म्हणजे समस्याही सुपर !- प्रशांत दैठणकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












