मुंबई : केंद्र सरकारला आंदोलकांच्या तीव्र विरोधामुळे माघार घ्यावी लागली. शनिवारी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा स्वीकारून सरकारने आंदोलकांची एक प्रमुख मागणी मान्य केली. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. ‘X’ वर प्रतिक्रिया देताना पवारांनी तरुणांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, “नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे तरुणांनी सलग २८ दिवस दिलेला लढा आणि त्यांनी दाखवलेली जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे.”
लोकशाही लढ्याचे प्रतीक
शरद पवार म्हणाले, “आंदोलकांच्या सततच्या मागणीला मान देऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी अखेर आज राजीनामा दिला. दडपशाहीची भीती न बाळगता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक ठरला आहे. देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा हा एक मोठा विजय आहे.”
“देशातील तरुणांना नैतिक आणि संसदीय पाठिंबा दिल्याबद्दल मी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांचेही मनापासून आभार मानतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की देशाच्या लोकशाहीत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे आणि याचे श्रेय निःसंशयपणे तरुण पिढीला जाते,” असेही शरद पवार यांनी नमूद केले.
नीट पेपरफुटी, आंदोलन आणि राजीनामा
नीट पेपरफुटीच्या घटनेबाबत केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या जात होत्या. दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू झाल्यानंतर या मागण्यांनी जोर धरला. २० जुलै रोजी संसदेच्या दिशेने निघालेल्या मोर्चावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली.
लाठीचार्जमुळे आंदोलनाची तीव्रता देशभर पसरली आणि देशाच्या विविध भागांत निदर्शने सुरू झाली. विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून संसदेत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर, सरकारने धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवले.
📌 महत्वाच्या बातम्या
- …म्हणून डोक्यात माज गेला असं समजू नका; उद्धव ठाकरे यांची मोदी सरकारवर टीका
- देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री होणार? संजय राऊत यांचा मोठा दावा
- Breaking News : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा! NEET आंदोलनाला मोठं यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











