🕒 1 min read
मुंबई – राज्यातील हजारो कोटींचे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडतात, त्याला नेमके जबाबदार कोण? याच लालफीतशाही आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच पारा चढला आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पायाभूत सुविधा वॉर रूमच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. “भगवान भरोसे काम चालवू नका, ऐसे कैसे काम चलेगा?” अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासकीय यंत्रणांची कानउघाडणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस संतापले: कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे संकेत
कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पांच्या कामातील दिरंगाई यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशाराच फडणवीसांनी दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या बैठकीपर्यंत एकही प्रलंबित मुद्दा शिल्लक राहता कामा नये, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व मोठे प्रकल्प येत्या साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे मोठे उद्दिष्ट त्यांनी अधिकाऱ्यांसमोर ठेवले आहे.
सर्वात मोठी बाब म्हणजे, निविदा प्रक्रियेत आता कंत्राटदारांचा जुना रेकॉर्ड तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. जुन्या प्रकल्पांना विनाकारण विलंब लावणाऱ्या कंपन्यांना यापुढे नवीन कामे दिली जाऊ नयेत, अशी अत्यंत कडक भूमिका मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) घेतली आहे.
दुसरीकडे, या बैठकीत धारावी आणि बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. धारावीतील स्थानिक उद्योजकांना दिलासा देण्यासाठी वस्तू आणि सेवा करात सवलत देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बीडीडी चाळ प्रकरणात पात्र रहिवाशांना भाडे देऊन सध्याच्या घरांचा ताबा घेत प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जानेवारी २०२९ पर्यंत ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा कोणत्याही स्थितीत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम मार्गी लावतानाच, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कॉरिडॉरजवळ गुंतवणूकदारांच्या मदतीने औद्योगिक क्षेत्रे उभारण्याचा विचारही बैठकीत मांडण्यात आला.
या बैठकीत मुंबईतील मेट्रो लाईन २, ५, ६ आणि ९ च्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर पुणे शहरातील मेट्रो लाईन ३, वर्तुळाकार मार्ग, मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेबाबतही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून इत्थंभूत माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या रौद्रावतारामुळे आता प्रशासकीय पातळीवर कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर भाजपात मोठे भगदाड, १५ बड्या नेत्यांनी एकाच वेळी सोडला पक्ष
- मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
- अभिजीत दिपकेंचे भारतात पाऊल, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी; राजधानीत नेमकं काय घडणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











