मुंबई – राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, पण विरोधक जुन्या जखमेवर मीठ चोळण्याची एकही संधी सोडत नाहीत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. निमित्त होतं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचं. पण या मुलाखतीपेक्षा चर्चा जास्त रंगलीय ती भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेची. शेलारांनी थेट राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवाचा मुद्दा उकरून काढत राज ठाकरेंना घेरलं आहे.
नेमकं काय म्हणाले शेलार?
ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर बोलताना शेलार म्हणाले, “हे सगळे फिल्मी लोक आहेत. दिवसभर सिनेमे बघायचे, घरच्यांसोबत फाफडा-जिलेबी खायची आणि गप्पा मारायच्या.” मुंबईकरांच्या प्रश्नांशी यांना काहीही देणेघेणे नाही. मुंबई जेव्हा पावसात बुडत होती, तेव्हा एक भाऊ बंगल्यावर तर दुसरा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आरामात होता, असा सणसणीत टोला शेलारांनी लगावला.
BJP leader Ashish Shelar slams Raj Thackeray
माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंचा पराभव हा राज ठाकरेंसाठी जिव्हारी लागणारा विषय आहे. नेमकं त्याच विषयावर बोट ठेवत शेलार म्हणाले, “तुमच्या घरातल्या व्यक्तीला (अमित ठाकरे) तुम्ही जिंकवू शकले नाहीत. ज्या ‘उबाठा’ सेनेने तुमच्या मुलाला घरी बसवलं, त्यांच्याशीच तुम्ही हातमिळवणी केली?” ज्यांनी मतदारांचा कौल घेऊन सत्ता मिळवली, त्यांच्यावर टीका करण्याआधी स्वतःच्या मुलाचा पराभव करणाऱ्यांशी युती कशी केली, याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
इतकेच नाही तर, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, असा ‘फुकटचा सल्ला’ द्यायलाही शेलार विसरले नाहीत. आता शेलारांच्या या ‘फाफडा-जिलेबी’ आणि ‘पुत्रप्रेमा’च्या टोमण्यावर ठाकरे बंधू काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रचाराचा ‘धूर’ निघाला! फटाक्यांमुळे इमारतीला आग; संतापलेली अभिनेत्री म्हणाली, “हे मूर्ख लोक…”
- वर्षा उसगांवकरांनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ खाजगी किस्सा; आईसमोरच म्हणाले, “मी बिअर पितो पण…”
- ‘किंग’ कोहलीने अचानक घेतली माघार; दिल्लीच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाही, कारण काय?













