मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्यांवरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस लवकरच दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. फडणवीसांना मोदी मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, असंही राऊत यांनी सूचक विधान केलं. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फडणवीस यांनी दिल्लीत जावे आणि सर्वोच्चपदी जावे ही फक्त एकनाथ शिंदेंची इच्छा नाहीये, तर महाराष्ट्राची इच्छा आहे, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. मोदी आणि फडणवीस यांची चर्चा काय झाली हे मी सांगू शकतो. माझे इंटेलिजन्स मजबूत आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut on Devendra Fadnavis
यावेळी संजय राऊत कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस रोज दिल्लीत का जात आहेत? 72 तासाने दिल्लीत का जावं लागतं? महाराष्ट्र एवढं मोठं राज्य आहे. उठसूट दिल्लीत जाऊन काय चर्चा करता? काय चर्चा करता हे मी सांगू शकतो. त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला. ते त्यांनी ठरवलं होतं का? ते नाही ठरवू शकत. त्यामुळे त्यांना दिल्लीत मोदी मंत्रिमंडळात जावं लागणार आहे.”
राष्ट्रीय राजकारणात फेरबदल होण्याची शक्यता आहे. मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या विचारात आहेत. ते करू शकत नाही. त्यांच्या पक्षात बंडाळ्या सुरू झाल्या आहेत. फेरबदल करताना नेहमी राजीनामे घेतले जातात. पण चार ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
“हे चार मंत्री जुने आहेत. ओरिजनल भाजपचे नेते आहेत. पादरे पावटे नाहीत. आता आलेले नेते नाहीत. हे चारही मंत्री आधी शाहांचा राजीनामा घ्या म्हणत आहेत. त्यामुळे फेरबदल झाला नाही,” असा दावा राऊतांनी केला.
नव्या फेरबदलात उपपंतप्रधानपद असावे. संघाच्या विचाराला मानणारा उपपंतप्रधान असावा. तो पंतप्रधानांचा वारसदार असेल. अमित शाह नाही, अशी संघाची भूमिका आहे. भाजपच्या अंतर्गत या घडामोडी घडत आहेत. मी कुणाचं नाव घेतलं नाही. तुमच्या मनात फडणवीस असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, असे विधानही राऊतांनी यावेळी केले.
अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहभाग असलेल्या कार्यक्रमाला विरोध होत आहे. राऊत यांनीही या विषयावर भाष्य केले. मोहन भागवत हे त्यांचे विचार मांडत आहेत. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे त्यांना त्यांचे विचार मांडू द्यावेत, असे राऊत म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ISRO EOS-05 Launch: भारताची सीमेवर 24 तास पाळत; चीन-पाकिस्तानवर बारीक नजर
- रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार होता? निवड समितीच्या ‘त्या’ मेसेजवर संतापलेला ‘हिटमॅन’, मोठी माहिती समोर
- भारतावर एल निनोचं मोठं संकट; फेब्रुवारी 2027 पर्यंत राहणार प्रभाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











