🕒 1 min read
मुंबई: एकीकडे उमेदवारीसाठी पक्षांतर्गत कल्ला, नाराजीनाट्य आणि हाणामारीच्या घटना घडत असताना, दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने ( BJP ) मतदानाची शाई बोटाला लागण्याआधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने जोरदार सलामी देत राज्यातील तीन महापालिकांमध्ये चक्क ६ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या पक्षातून आलेल्या ‘आयात’ उमेदवारालाही या निवडणुकीत लॉटरी लागली आहे.
कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने किंवा प्रतिस्पर्धी नसल्याने कमळ फुलले आहे. कल्याण-डोंबिवलीत रेखा चौधरी (प्रभाग १८), आसावरी नवरे (२६ क) आणि रंजना पेणकर (२६ ब) या तिघींनी बाजी मारली. तर पनवेलमध्ये नितीन पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वात जास्त चर्चा रंगली ती धुळ्याची. इथे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपचा झेंडा हाती घेणाऱ्या उज्ज्वला रणजीतराजे भोसले आणि ज्योत्स्ना पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल करणाऱ्या उज्ज्वला भोसले यांच्यासाठी हा मोठा सुखद धक्का मानला जात आहे. या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
मुंबई महापालिकेतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता उलथवून लावण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री मैदानात उतरत आहेत. ३ जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू होणार असून, केवळ १० दिवसांत ४० हून अधिक सभा घेण्याचे नियोजन आहे.
मुंबई आणि ठाण्यातील उत्तर भारतीय मतदारांना साद घालण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह नितीन गडकरी आणि पियूष गोयल हे दिग्गज नेतेही प्रचारात उतरणार आहेत. एकंदरीत, मतदानाआधीच पडलेला हा ‘षटकार’ विरोधकांचे धाबे दणाणणारा ठरू शकतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- “आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते भडकले, सुनील केदारांनी काढला पळ!
- नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले…
- “वाघीण जखमी झाली की अधिक लढाऊ होते”; उमेदवारी मागे घेताच भाजपच्या पूजा मोरे-जाधवांचा अश्रूंचा बांध फुटला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












