मुंबई: दिल्लीतील आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या जंतर-मंतर (JantarMantar) येथे जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे आणि या आंदोलनात अधिकाधिक विद्यार्थी व तरुण सहभागी होत आहेत. आता आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या आंदोलनाला ‘फेसलेस’ (faceless) फेसलेस म्हणत अपप्रवृत्ती आंदोलनात घुसल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी टिप्पणी केली की, या फेसलेस असलेल्या आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय अशी अवस्था झाली आहे, असा पलटवार शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.
“गेल्या दोन आठवड्यांपासून आपण दिल्लीत तरुणांना आंदोलन करताना पाहत आहोत. आमचे खासदार सोनम वांगचुक यांना भेटायला गेले होते, पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. काल आम्ही त्यांना संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढताना पाहिले. आम्हाला अपेक्षा होती की एखादा मंत्री त्यांना भेटेल आणि चर्चा करेल. त्याऐवजी, काल आम्ही जे पाहिले ते ब्रिटिश काळातील अत्याचारांपेक्षाही भयंकर होते,” असे आदित्य ठाकरे म्हणाले. “पोलिसांनी महिला आणि लहान मुलांवर हल्ला केला. रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी त्यांच्या नेमप्लेट्सही काढून टाकल्या होत्या. यापूर्वी, भाजप सरकारने शेतकऱ्यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवले होते आणि त्यांच्या अंगावर गाड्या घातल्या होत्या.”
“मुंबईतील शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवरही शांततापूर्ण आंदोलन सुरू करण्यात आले होते, जिथे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आमचे पक्ष कार्यकर्ते घटनास्थळी धावून गेले आणि त्यांनी त्या तरुणांची सुटका केली,” अशी माहिती आदित्य यांनी दिली. मात्र, त्या तरुणांना आज सकाळी पुन्हा नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. “त्यामुळे, आम्ही shivsenaubtlegal@gmail.com हा ईमेल आयडी जारी केला आहे. जर तुम्ही NEET परीक्षेच्या मुद्द्यासाठी किंवा सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोर्चा किंवा आंदोलन आयोजित केले आणि तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, तर आम्ही कायदेशीर मदत देऊ. तुम्हाला फक्त आम्हाला ईमेल पाठवायचा आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
या संपूर्ण मुद्द्यावरून भाजपविरुद्ध आंदोलन करताना विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास, मी वकिलांना आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन त्यांना मदत करावी. इतर सर्व संघटना विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे आहेत. ABVP कुठे आहे? ही विशिष्ट संघटना कुठेही दिसत नाही. भाजप देशद्रोही, विद्यार्थीद्रोही आहे, असे म्हणत ABVPच्या भूमिकेवर आदित्य यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच, आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील आंदोलन ‘फेसलेस’ असल्याचे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांनी आता या विधानावर पलटवार केला आहे. फडणवीस हे दहा वर्षे गृहमंत्री होते याची आठवण करून देत आदित्य म्हणाले की, हे तरुण विद्यार्थी अराजकता माजवतील असे गुप्तचर यंत्रणांना वाटत असावे. त्यांनी फडणवीसांवर टीका करताना म्हटले की, “फेसलेस आंदोलन आहे म्हणून भाजपला फेस आणलाय या आंदोलनाने.”
📌 महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi : ‘यावेळी सुटणार नाही’, राहुल गांधींची थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची हाक
- शरद पवार जंतर-मंतरवर; अभिजित दीपकेंची घेतली भेट
- दिल्लीत विद्यार्थ्यांचे रौद्र आंदोलन; राहुल-प्रियंका मैदानात, मोदी निवासाबाहेर काँग्रेसचे धरणे













