राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज देशाची राजधानी दिल्लीला अचानक भेट दिली. मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून ते दिल्लीला रवाना झाल्यामुळे विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना (Shivsena) पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाबाबतची सुनावणी उद्या (बुधवार, २ सप्टेंबर) पुन्हा सुरू होणार असून, त्यात शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडणार आहेत.
या पार्श्वभूमीवर, शिंदे यांची दिल्ली भेट महत्त्वपूर्ण ठरली आणि त्याबद्दल अनेक वर्तुळांतून आश्चर्य व्यक्त केले गेले. दिल्लीत पोहोचल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी उद्याच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या आधी एक महत्त्वाचे विधान केले; त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत ‘धनुष्य-बाण’ हे चिन्ह गोठवण्याच्या मागणीला ‘दुर्दैवी’ असे संबोधले.
Eknath Shinde on Shivsena symbol
“मी दिल्लीत येत असतो, आमच्या राज्य प्रमुखांच्या बैठका आहेत. सुप्रीम कोर्टात जी हिअरिंग झाली, त्याचा आढावा घ्यायचा आहे. उद्यापासून शिवसेनेच्या बाजून जे आर्ग्युमेंट होईल त्याबाबत देखील चर्चा केली,” असे शिंदे यांनी सांगितले.
“खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी आणि दु:खद बाब आहे. धनुष्यबाण गोठवण्याची मागणी अतिशय दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते धनुष्यबाण देव्हाऱ्यात ठेवायचे,’ असं शिंदे म्हणाले.
“बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी ( ठाकरे) 2019 मध्येच गोठवले होते. हिंदुत्वही गोठवलं, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दिलेल मँडेटही त्यांनी गोठवलं. बाळासाहेबांची घटनाही गोठवली, ती घटना बदलण्याचं कामही त्यांनी केलं आणि आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी ते करत आहेत. म्हणजे बाळासाहेबांचे जे काही विचार, त्यांची भूमिका, त्याचं धोरण, राष्ट्रीयत्वाचे विचार पुसण्याचं काम दुर्दैवाने काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे देखील शिंदे म्हणाले.
पुढे शिंदे म्हणाले की, “पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाणारे आहोत. लोकांनी देखील आम्हाला स्वीकारलं आहे, जनतेनेही आशीर्वाद दिले आहेत,” असे शिंदे म्हणाले.
शिवसेनेच्या चिन्हाबाबतच्या प्रकरणावर आपण अधिक भाष्य करणार नाही, कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे शिंदे यांनी सांगितले. “लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते आणि त्यावरच निर्णय होत असतो. आम्ही न्यायालयाचा सन्मान राखणारे लोक आहोत, आदर राखणारे लोक आहोत. पण काही लोकं तर न्यायालयालाही मार्गदर्शन करतात.” असे शिंदे यांनी सांगितले.
“निवडणूक आयोगाबाबतही वाटेल ते बोलतात, बेछूट आरोप करतात. तशी भूमिका आमची नाही. यावर मी जास्त चर्चा करू इच्छित नाही. न्यायदेवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. मात्र जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे, हे महाराष्ट्राला आणि देशालाही माहीत आहे.” असा टोला शिंदे यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनसेसोबतची युती तोडा, अन्यथा विरोधात बसू; भाजपचा शिवसेनेला इशारा
- ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; भाचीचा संशयास्पद मृत्यू, घरात आढळला मृतदेह
- CJP ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; आंदोलकांवरील FIR रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











