🕒 1 min read
मुंबई (Sanjay Raut) – देशातील लोकशाही खरोखरच धोक्यात आली आहे का? की पैशांच्या बळावर कुणीही काहीही विकत घेऊ शकतं? हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कारण, ठाकरे गटाच्या ज्या ६ खासदारांनी काही दिवसांपूर्वी बंडखोरी केली होती, त्यांना आता लोकसभेत अधिकृतपणे शिंदे गटाचे खासदार म्हणून मान्यता मिळाली आहे.
दिल्लीतून आलेल्या या घडामोडीमुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे. लोकसभा सचिवालयाने आणि स्वतः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा आणि अनपेक्षित धक्का मानला जातोय. आता हे ६ खासदार कायदेशीररित्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे भाग झाले आहेत.
Shivsena UBT vs Shinde : राऊतांचा सर्वोच्च न्यायालयावरच निशाणा
या निर्णयावर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारलाच धारेवर धरलंय. “सर्वोच्च न्यायालयही आता गुलाम झालं आहे,” असा अत्यंत गंभीर आरोप राऊत यांनी केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, जर सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या ४० आमदारांच्या अपात्रतेचा प्रलंबित निकाल वेळेत दिला असता, तर देशात असे वारंवार पक्ष फोडण्याचे प्रकार घडले नसते. १० व्या परिशिष्टात अशा पक्षफुटीला कोणतीही मान्यता नसताना लोकसभा अध्यक्षांनी हा निर्णय कसा घेतला, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करताना राऊत चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले की, हे सहाही खासदार ५० कोटींना विकले गेले आहेत. ज्या मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर ते निवडून आले, त्याच पक्षाशी त्यांनी गद्दारी केली आहे. ‘शिंदे म्हणजे काही विनोबा भावे नाहीत, त्यांनी दाढीवरून हात फिरवत आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये,’ असा घणाघात त्यांनी केला.
या ५० कोटींच्या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, राऊतांनी यावरून सत्ताधाऱ्यांना ‘सिरीयल रेपिस्ट’ आणि ‘सिरीयल किलर’ अशी जळजळीत उपमा दिली. एकीकडे लोक अन्नाविना, पाण्याविना तडफडत आहेत आणि दुसरीकडे ५०-५० कोटींना लोकप्रतिनिधी विकत घेतले जात आहेत, ही लोकशाहीची हत्या असल्याची उद्विग्नता राऊत यांनी बोलून दाखवली.
📌 महत्वाच्या बातम्या
- परळीत ‘डी कंपनी’च्या नावाने दहशत; ‘पायावर नाही, मुंडकं उडवा आणि माझ्याकडे आणा’ थेट नगरसेवकाचा आदेश
- Facebook Down: अचानक फेसबुक अकाऊंट्स का झाली बंद? जगभरात गोंधळ
- न्यायालयाकडून मराठा आंदोलकांना जामीन; पण ८१ गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












