मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रात येऊन मन मोकळे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशभरात भाजपविरोधकांचे बोलण्याचे स्वातंत्र्य दडपले असले तरी महाराष्ट्रात सगळ्यांचेच स्वातंत्र्य अबाधित आहे. त्यामुळेच शहा यांनी कारण नसताना जुन्या खपल्या पुन्हा खाजवल्या आहेत. शिवसेनेने सत्तेसाठी दगाबाजी केली व आता हिंमत असेल तर एकटे लढून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले. शहांचे नेमके वय किती ते माहीत नाही. पण आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली आहे. असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समान अग्रलेखातून लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाचे बोट धरायला कोणी तयार नव्हते तेव्हा त्या एकटेपणातून त्यांना बाहेर काढून खांद्यावर गावभर मिरविणारी शिवसेनाच आहे. पुन्हा शहा यांना अलीकडच्या घडामोडींचाच विसर पडलेला दिसतोय. 2014 साली ते स्वतः अध्यक्ष असतानाच त्यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेशी नाते तोडले होते. तेव्हा शिवसेना एकटय़ानेच लढली होती. शिवसेनेला एकटय़ाने लढण्याची, अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन लोळविण्याची सवय आहे व लढण्यासाठी शिवसेनेला तपास यंत्रणांची ‘चिलखते’ वापरावी लागत नाहीत. शिवसेनेच्या हाती सत्याची वाघनखे आहेत. याचा अनुभव देशातील अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे.
अमित शहा यांचा संताप समजण्यासारखा आहे. प्रयत्नांची शर्थ करूनही ते महाराष्ट्रातील ‘तीन चाकी’ सरकारचे टायर पंक्चर करू शकलेले नाहीत. केंद्रीय गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे, ‘राज्यातील सरकार तीन चाकी रिक्षा आहे. रिक्षा आता बंद पडली आहे. हे विधान हास्यास्पद आणि गोरगरीबांचा अपमान करणारे आहे. मोदींच्या सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरावर नेऊन ठेवल्यामुळे सामान्यांना फक्त रिक्षाच परवडू शकते. महाराष्ट्राच्या सरकारला निदान तीन चाके तरी आहेत. केंद्रातले सरकार म्हणजे उताराला लागलेली गाडी आहे. २०२४ साली या गाडीचे ब्रेक निकामी झाल्याशिवाय राहणार नाहीत असे देशाचे वातावरण बदलताना दिसत आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रधार आहे या पोटदुखीतून फालतूच्या टिकाटिपण्या सुरू आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे वैफल्य समजण्यासारखे आहे, पण देशाचे गृहमंत्रीही त्याच वैफल्यातून बोलू लागतात तेव्हा आश्चर्य वाटते. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याची, असहकार पुकारण्याची एकही संधी केंद्रीय गृहमंत्रालय सोडत नाही. शिवसेनेला सत्तेची हाव आहे व भाजप मात्र त्याबाबत सोवळ्यात आहे, सत्ता दिसली की, भाजप रोज एकादशीचे क्रत पाळतो, असे त्यांना म्हणायचे आहे. ते खरे असेल तर पहाटेच्या शपथविधीचा राजभवनातील ‘सत्ता नारायण’ कोणी बांधला होता? त्यामुळे सत्य नारायण कोणाचा व सत्ता नारायणवादी कोण याचे बिंग तेव्हाच फुटले होते. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- .तर यंदा औरंगाबादेतील क्रांती चौकात थाटात साजरी होणार शिवजयंती
- बदनापूर नगर पंचायतीत बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत; आ. नारायण कुचे-संतोष सांबरेत हमरीतुमरी..!