🕒 1 min read
मुंबई: एकेकाळी भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा मानला गेलेला युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या आपल्या कारकिर्दीतील अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. प्रतिभावान असूनही त्याला सध्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये संधी मिळणे कठीण झाले आहे. अलीकडेच त्याला मुंबईच्या संघातून वगळण्यात आले, तर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावातही तो ‘अनसोल्ड’ राहिला. मात्र, या सर्व चढ-उतारांमध्येही भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने त्याच्यावर विश्वास दाखवला असून, तो नक्कीच पुनरागमन करू शकतो, असे म्हटले आहे.
पृथ्वी शॉ गेल्या काही काळात क्रिकेटपासून विचलित झाल्याचे आणि त्याचा परिणाम त्याच्या कारकिर्दीवर झाल्याचे म्हटले जाते. सध्या त्याला भारतीय संघात तर सोडाच, पण देशांतर्गत क्रिकेटमध्येही संधी मिळणे अवघड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, सचिन तेंडुलकरने ( Sachin Tendulkar ) त्याला पुन्हा एकदा योग्य मार्गावर येण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. शॉने स्वतः सांगितले की, त्याचे वडील आणि सचिन तेंडुलकर हे त्याचे सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत.
Sachin Tendulkar’s Advice to Prithvi Shaw
कमी वयातच आपल्या क्रिकेट कौशल्यामुळे पृथ्वी शॉला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, परंतु यामुळे तो काहीसा वाहत गेला. त्याचा सराव कमी झाला आणि त्याने इतर गोष्टींना अधिक महत्त्व दिले. ‘मी चुकीच्या मित्रांची निवड केली,’ अशी कबुलीही त्याने दिली आहे. पृथ्वी शॉने सचिन तेंडुलकरसोबत झालेल्या भेटीचा प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “सचिन सरांना माझा क्रिकेटमधील प्रवास माहीत आहे. मी आणि अर्जुन ८-९ वर्षांचे असल्यापासून एकत्र खेळत मोठे झालो आहोत. सचिन सरही काही वेळेस आमच्याबरोबर सरावासाठी तिथे असायचे.”
“सचिन सरांशी मी दोन महिन्यांपूर्वी बोललो होतो. ते एमआयजीच्या (MIG) मैदानावर सराव करत होते आणि मी सुद्धा तिथेच होतो. तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली होती.” शॉ सचिनविषयी पुढे म्हणाला, “त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे. सचिन सर म्हणाले, ‘पृथ्वी, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझ्यावरचा हा विश्वास कायम असेल.’ कारण त्यांनी मला सुरुवातीपासून पाहिले आहे. मला आजही ते ( Sachin Tendulkar ) हेच म्हणतात ‘पुन्हा योग्य मार्गावर ये, जसा आधी होतास.’ सर्वकाही अजूनही शक्य आहे.’ त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि ही गोष्टच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.”
दरम्यान, पृथ्वी शॉने आता मुंबई क्रिकेट संघाची साथ सोडली आहे. तो आता मुंबई सोडून महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) देखील त्याला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारतीय महिला संघाचे इंग्लंडविरुद्ध विजयी सलामीचे लक्ष्य; आजपासून ट्वेन्टी२० मालिकेला सुरुवात
- उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला; फडणवीसांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
- हिंदी सक्तीविरोधात केदार शिंदेंची लक्षवेधी पोस्ट: “ठेच लागल्यावर ‘आई गं’ की ‘ओ मेरी माँ’?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








