🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी ५ जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच सरकारने हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला होता. आता सत्तेत नसताना विरोधात बसल्यावर ते विरोध करत आहेत, हे काही त्यांचं मराठीचं प्रेम नाही,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही. हिंदी पर्यायी विषय आहे. हिंदी किंवा कुठलीही भाषा शिकता येईल असा पर्याय दिला आहे.” नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP 2020) त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून, जेव्हा हे धोरण आले, तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, असे फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी आठवण करून दिली.
Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “उद्धव ठाकरे सरकारने यावर अभ्यास करून नीती ठरवण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर होते आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर, सुखदेव थोरात यांसारखे १८ मान्यवर सदस्य होते. या समितीने २०२१ मध्ये एक अहवाल तयार करून तो उद्धव ठाकरेंच्या सरकारला दिला. उद्धव ठाकरे सरकारने तो अहवाल स्वीकारला आणि त्यानंतर पुढची कारवाई झाली.”
फडणवीस यांच्या मते, या अहवालात स्पष्टपणे मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा, असे सांगितले होते. “हे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये झाले आहे. उद्धव ठाकरेंनी हे सांगितले आहे की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत. आता असा अहवाल आहे. भालचंद्र मुणगेकर, डॉ. माशेलकर, सुखदेव थोरात यांनी तो अहवाल दिला होता, त्यांना तुम्ही महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहात का?” असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केला.
नवे शैक्षणिक धोरण ही एक शास्त्रीय प्रक्रिया असून, आपले विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत यासाठी हे सूत्र तयार करण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. “विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये भाषा शिकण्याची क्षमता कधी असते, यावर संशोधन करून हे धोरण तयार झाले आहे. अधिकच्या भाषा विद्यार्थी शिकू शकतात. हा काही आमच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा नाही. आम्ही एका मिनिटात सांगितले, कुठलीही भाषा शिका. प्रश्न हिंदी सक्तीचा नाही, हिंदीला विरोधाचा आहे. यांचा हिंदीला विरोध आहे.”
फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, “मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की, भारतात तुमचा इंग्रजीला विरोध नाही. यांच्यापैकी एकानेही इंग्रजीला विरोध केलेला नाही. भारतीय भाषा असलेल्या हिंदीला विरोध करण्यात येतो आहे. हा विरोधाभास आहे.” ते म्हणाले, “मराठी आणि हिंदी स्पर्धा आली तर आधी मराठी. मराठी आमची मायबोली आहे, त्यामुळे सक्तीची मराठीच. पण आमच्या मुलांना तीन भाषा शिकायच्या असतील तर हरकत काय? तीन भाषा शिकल्या नाहीत तर त्या विषयाचे क्रेडिट मिळणार नाहीत. चांगले टक्के मिळवूनही क्रेडिटचे मार्क दुसऱ्याजवळ जास्त असल्याने त्याला तो प्रवेश मिळेल.”
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेतील विसंगतीवर बोट ठेवले. “सत्तेत असताना वस्तुस्थिती समजून घ्यायची, समिती स्थापन करायची आणि आपण विरोधी पक्षात गेल्यानंतर भूमिका बदलायची?” “मुलांच्या हिताचं काय आणि मराठीच्या हिताचा विचार आम्ही करू. राजकारणाचा काही संबंधच नाही. हा विरोध हिंदी सक्तीला नाही. इंग्रजीला पायघड्या घालणारे हिंदीला विरोध करत आहेत.”
राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलताना फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे जे काही करत आहेत ती राजकीय भूमिका आहे, असं म्हणणार नाही. पण मी इतकंच सांगतो की महापालिका निवडणुका नसत्या, तर अशा प्रकारचा विरोध झाला नसता. राज ठाकरे माझे मित्र आहेत, तर त्यात काय? त्यांची भूमिका वेगळी आहे, सगळ्यांच्या सारख्या भूमिका असत्या, तर सारख्या पक्षात राहिले असते. उद्धव ठाकरेंनी जर एखादा अहवाल स्वीकारला आणि आता तेच त्याच्या विरोधात बोलत आहेत, याचा अर्थ राजकीयच आहे ना?” हे काही मराठीचं प्रेम नाही, असे फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी ठामपणे नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- हिंदी सक्तीविरोधात केदार शिंदेंची लक्षवेधी पोस्ट: “ठेच लागल्यावर ‘आई गं’ की ‘ओ मेरी माँ’?”
- “शासनाच्या प्रत्येक बाबीत न्यायालयांनी हस्तक्षेप करू नये!” सरन्यायाधीश गवईंचे नागपुरात महत्त्वाचे विधान
- हिंदी सक्तीवरून महायुतीत फूट? ठाकरे-मनसे मोर्चाला भाजपाचा विरोध, शिंदे गटाचा पाठींबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










