मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची जागा मनसेने ( Raj Thackeray ) मागितली होती. या दोन्ही जागांवरुन शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे आम्ही तेव्हाच सांगितले होते.
दोन्ही जागा निवडून आणणे तुमच्या हातातील गोष्ट नाही, या जागा तुम्हाला लागणार नाहीत, असे आम्ही सांगितले होते. या दोन्ही जागा मनसेला लढवू द्या. आम्ही त्या जागा 100 टक्के जिंकल्या असत्या. पण त्यावेळी शिंदे गटाकडून मनसेच्या (MNS) उमेदवारांनी आमच्या चिन्हावर लढावे, असे सांगितले.
निवडणूक आमच्या निशाणीवर लढली गेली पाहिजे. त्यावर मी बोललो की, अहो आमच्या पक्षाची निशाणी कमावलेली आहे, ती ढापलेली नाही. आमची निशाणी ही निवडणुकीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात मिळाली आहे. लोकांच्या मतदानामुळे ही निशाणी आम्हाला मिळाली, ती कोर्टातून आलेली नाही, असा टोला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
अमित ठाकरेंना उद्धव यांचा पाठिंबा नाही- राज ठाकरे
आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहिले होते, तेव्हा मी विचार केला की, विरोधातील पक्ष असला तरी मी नातेसंबंध जपणारा आहे. मी त्या विचारात वाढलेला आहे. वरळीत मनसेची 38-39 हजार मतं आहेत, तरीही आदित्य तिकडे लढतोय, मग तिकडे मनसेचा उमेदवार नको देऊयात.
मी जो विचार करतो, तेवढ्याच सुज्ञपणे समोरचा विचार करेल, ही माझी अपेक्षा नाही. मी चांगल्या हेतूने जी गोष्ट केली, तीच गोष्ट दुसरा माणूस करेल किंवा त्याने करावी, असे नाही. आदित्यविरोधात वरळीत उमेदवार द्यायचा नाही हे मी ठरवले, तेव्हा मी फोन करुन कोणाला सांगितले नाही. मला तेव्हा आदित्यविरोधात उमेदवार देऊ नये, असे वाटले, मला या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नाही.
अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या