काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दररोज वाढत असून आज टिळक भवनमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार अविनाश घाटे, राज्य ग्राहक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुखी, प्रवक्ते उमर फारुखी, अकोला जिल्ह्यातील वंचितचे डॉ. रहेमान खान, बाळापूरचे माजी नगराध्यक्ष जम्मूसेठ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
राज्यातील भाजपा शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून शेतकरी, कामगार यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महागाईने जगणे कठीण झाले आहे परंतु राज्यातील युती सरकार जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही.
काँग्रेस पक्षाची विचारधाराच देशाला तारणारी असून राहुल गांधी यांची देश जोडणारी भूमिका सर्वात महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यात काँग्रेस पक्षच सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करून काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहचवा असे आवाहन नाना पटोले यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या