🕒 1 min read
मुंबई– मुंबईत राहणं म्हणजे दररोज एक नवी लढाई… लोकलची गर्दी, ट्रॅफिक जॅम आणि पावसाळ्यात तुंबणारं पाणी. पण हे चित्र कायमच असं राहणार का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या काही वर्षांत मुंबईच्या विकासाचा ‘इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅन’ केवळ कागदावर मांडला नाही, तर तो सत्यात उतरवून दाखवला आहे. रस्ते, रेल्वे, पाणी आणि हक्काचं घर या चारही आघाड्यांवर मुंबईचा चेहरामोहरा बदलतोय.
जमीन, आकाश आणि पाणी
कनेक्टिव्हिटीचा ‘त्रिवेणी’ संगम मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम’ राबवली आहे. दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर काही मिनिटांत कापण्यासाठी उभारलेला २१.८ किमीचा ‘अटल सेतू’ (MTHL) हा देशातील सर्वात लांब सागरी मार्ग आता राज्याच्या प्रगतीचा हायवे ठरला आहे. दुसरीकडे, नरिमन पॉईंट ते कांदिवली हा पट्टा जोडणारा ‘कोस्टल रोड’ पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचवत आहे. केवळ रस्तेच नाही, तर ज्या मुंबईला अथांग समुद्रकिनारा लाभलाय, तिथे जलवाहतुकीचा पर्यायही खुला करण्यात आला आहे. ‘वॉटर टॅक्सी’ (Water Taxi) आणि रो-रो फेरी सेवेमुळे मुंबई ते नवी मुंबई आणि अलिबाग हा प्रवास पर्यटनासोबतच वेगवान झाला आहे.
मेट्रोचं जाळं आणि ‘फिनटेक’ भरारी
‘लोकल’वरील ताण कमी करण्यासाठी फडणवीसांनी मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही भुयारी मेट्रो-३ असो किंवा उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो २ए आणि ७; यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरे जवळ आली आहेत. यासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईला आशियातील सर्वात मोठे ‘डेटा सेंटर हब’ बनवण्याचे धोरण शहराला ‘फिनटेक सिटी’ म्हणून नवी ओळख देत आहे.
बीडीडी चाळ ते धारावी: सामान्यांच्या स्वप्नांची पूर्तता इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहत असताना, इथल्या भूमिपुत्राला विसरून चालणार नाही, हे फडणवीसांनी ओळखले. म्हणूनच, अनेक दशकांपासून रखडलेला बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावून मध्यमवर्गीय मराठी माणसाला हक्काचं आधुनिक घर मिळवून देण्याचं काम सुरू झालं आहे. तसेच, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचा ऐतिहासिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबई ‘स्लम फ्री’ होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
वॉर रूम आणि शाश्वत विकास
इतके मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होतात कसे? याचे उत्तर आहे मंत्रालयातील ‘सीएम वॉर रूम’ (CM War Room). पर्यावरण परवानग्यांपासून ते जमीन संपादनापर्यंतचे सर्व अडथळे एकाच छताखाली दूर केल्याने प्रकल्पांना गती मिळाली. विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी शाश्वत विकासावर (Sustainable Development) भर देण्यात आला आहे. बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसची वाढ आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प (STP) राबवून समुद्राचे प्रदूषण रोखण्याचे प्रयत्नही युद्धपातळीवर सुरू आहेत.
फडणवीसांच्या या ‘व्हिजन’मुळे मुंबई केवळ राहण्यायोग्य नाही, तर जागतिक दर्जाचे ‘लिहेबल’ (Liveable) शहर बनण्याच्या मार्गावर आहे, हे नक्की!
📌 महत्वाच्या बातम्या
- दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
- ‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
- BMC Election 2026: ऐन निवडणुकीत भाजप-मनसे भिडले; मोठा राडा, ‘त्या’ एका कारणावरून हाणामारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











