🕒 1 min read
पटना : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर (Prshant Kishor) यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. 30 जुलै रोजी मतदान होणार असून 3 ऑगस्टला निकाल जाहीर होईल. गेल्या तीन दशकांपासून भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आता हायव्होल्टेज लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. (Prashant Kishor Bankipur By Election)
बांकीपूर हा बिहार भाजप अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Navin) यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली. दरम्यान, भाजपकडून नितीन नवीन यांचे निकटवर्तीय आणि दिवंगत नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे सहकारी नील रतन घोष यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.
भाजपला पराभूत करण्याचा निर्धार
उमेदवारी जाहीर करताना प्रशांत किशोर म्हणाले की, “जन सुराजने बांकीपूरमध्ये भाजपला पराभूत करण्याचा निर्धार आधीच जाहीर केला आहे. माझ्या उमेदवारीमुळे भाजपला हा मतदारसंघ गमवावा लागला, तर मी ती लढाई लढण्यास पूर्णपणे तयार आहे.”
जन सुराजसाठी महत्त्वाची परीक्षा
2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. 243 पैकी 238 जागांवर उमेदवार उभे करूनही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
विश्वासार्हता सिद्ध करण्याची संधी
यापूर्वी प्रशांत किशोर यांनी राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांनी अखेरीस माघार घेतल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. आता बांकीपूरमधून थेट निवडणूक लढवून ते स्वतःची राजकीय विश्वासार्हता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगली लढत किंवा विजय मिळाल्यास जन सुराज हा केवळ रणनीतीचा पक्ष नसून जमिनीवरही प्रभावी शक्ती असल्याचा संदेश जाईल.
पर्यायी राजकारणाची खरी कसोटी
प्रशांत किशोर सातत्याने शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करण्याचा दावा करत आहेत. जातीय समीकरणांपेक्षा विकासाचा मुद्दा मांडणाऱ्या त्यांच्या राजकारणाला बांकीपूरसारख्या शहरी आणि सुशिक्षित मतदारसंघात किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात थेट आव्हान
1995 पासून बांकीपूर मतदारसंघात भाजपचा पराभव झालेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात प्रशांत किशोर यांची उमेदवारी ही भाजपसाठी मोठे आव्हान मानली जात आहे. दुसरीकडे, महाआघाडी कमकुवत असल्याने विरोधी मतांचे ध्रुवीकरण जन सुराजच्या बाजूने होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- New EPF Scheme 2026: आता हातात येणार जास्त पगार? नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
- काजोलने साडीतील फोटो शेअर करत केला भन्नाट ‘दावा’; विनोदी पोस्ट तुफान व्हायरल
- राम मंदिर प्रकरणावर RSS ची स्पष्ट भूमिका! ‘हिंदू समाजाने अफवांना बळी पडू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












